मुंबई : जकात नाक्यावरील कर्मचारीही निवडणुकीच्या कामात गुंतल्याचा आर्थिक फटका पालिकेला बसणार आहे़ कर्मचा-यांविना जकात नाकाच बंद करण्याची वेळ येणार असल्याने या कर्मचाऱ्यांना कामातून वगळा, अशी विनंती आता पालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे़निवडणुकीच्या कामात प्रामुख्याने पालिका कर्मचाऱ्यांना घेण्यात येत असते़ त्यानुसार आतापर्यंत आठ हजार पालिका कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले आहेत़ मात्र ही यादी पाठविताना नजरचुकीने जकात नाक्यांवरील कर्मचाऱ्यांचीही नावे गेली़ त्यामुळे तब्बल १६० कर्मचारी या कामामध्ये गुंतले आहेत़ दोन दिवसांचे प्रशिक्षण तसेच निवडणुकीच्या आधीचा एक दिवस व निवडणुकीच्या दिवशी असे चार दिवस हे कर्मचारी व्यस्त असणार आहेत़ या काळात जकात नाक्यांवर येणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी मनुष्यबळ कमी पडणार आहे़ याचा परिणाम जकात वसुलीस बसून कोट्यवधीचे नुकसान पालिकेला होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)
जकात नाक्यांनाही फटका!
By admin | Updated: September 25, 2014 01:36 IST