Join us  

आता ‘पोलीस गुगल’मुळे गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 5:33 AM

- मनीषा म्हात्रे मुंबई : मुंबई पोलिसांसाठी गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करणाऱ्या अ‍ॅम्बीस (आॅटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टिम) ही प्रणाली ...

- मनीषा म्हात्रे मुंबई : मुंबई पोलिसांसाठी गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करणाऱ्या अ‍ॅम्बीस (आॅटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेन्टिफिकेशन सिस्टिम) ही प्रणाली आता लवकरच राज्यभरात सुरू होणार आहे. त्यामुळे राज्य पोलिसांना आरोपींबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणे शक्य होणार आहे. ही प्रणाली वापरणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे.पूर्वी बोटांच्या ठशांवरून आरोपींची ओळख पटवण्यात येत असे. त्यासाठी पुणे येथील केंद्राकडे पोलिसांना धाव घ्यावी लागत असे. सीसीटीव्हींनी टिपलेले छायाचित्र किंवा चित्रण अंधुक असल्यास आरोपींची ओळख पटवणे पोलिसांसाठी अशक्य होते. मात्र अ‍ॅम्बीसमुळे बोटांच्या ठशांसोबत बुब्बुळ, हाताच्या तळव्यांचे ठसे, चेहेरा किंवा छायाचित्रांद्वारे संशयितांची, आरोपींची, गुन्हेगारांची ओळख चुटकीसरशी पटवली जाते. अ‍ॅम्बीसमध्ये १९६० ते जून २०१९पर्यंत अटक झालेल्या साडेसहा लाखांहून अधिक आरोपींचे तपशील डिजिटल स्वरूपात साठविण्यात आले आहेत. जूननंतर अटक होणाºया आरोपींचे बुब्बुळ, हाताचे ठसेही अन्य तपशिलांसोबत साठविले जात आहेत.इतकेच नव्हे तर छायाचित्रावरून किंवा सीसीटीव्हींनी कैद केलेल्या चित्रणावरूनही गुन्हेगारांची ओळख पटू शकेल, त्यांची इत्थंभूत माहिती पोलिसांना मिळू शकेल. महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेत ही अद्ययावत प्रणाली विकसित केली. या प्रणालीमुळे तपास अधिकाऱ्यांच्या हाती सीसीटीव्हीचे अंधुक, अस्पष्ट चित्रण असले तरी त्याचा फायदा होऊ शकतो. दहा मिनिटांच्या सीसीटीव्ही चित्रणातून ही प्रणाली आरोपीची असंख्य छायाचित्रे, चित्रणाचे छोटे भाग तयार करते. चेहेºयाचा २६ टक्के भाग दिसल्यासही प्रणाली आरोपीची ओळख पटवू शकते. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी शहरातील ८५ गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांच्या हाती लागलेल्या ठशांवरून या प्रणालीने ११८ आरोपींची ओळख एका झटक्यात पटवून दिली. त्यामुळे आरोपीला झटपट अटक करणे यामुळे शक्य होणार आहे. ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर ती कोणत्याही पोलीस ठाण्यातून हाताळणे शक्य आहे. अ‍ॅम्बीस आणि सायबर महाराष्ट्रने आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील सहा पारितोषिके पटकावली आहेत.‘गुन्ह्यांची उकल झटपट होण्यासह दोषसिद्धी प्रमाण वाढेल’बलात्कार, हत्या, दरोडा, जबरी चोरी किंवा महिलांविरोधातील गंभीर गुन्हे घडल्यानंतर आरोपीची ओळख पटणे सर्वात महत्त्वाचे असते. ती पटली की पुढील तपास करणे सोपे जाते. याच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. येत्या दोन महिन्यांत ही प्रणाली राज्यात सर्वत्र सुरू होणार आहे. त्यामुळे गुन्ह्यांची उकल झटपट होईल आणि दोषसिद्धी प्रमाण वाढेल, असा विश्वास सायबर महाराष्ट्रचे प्रमुख ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला आहे. नववर्षात या प्रणालीमुळे कामाचा व्याप कमी होण्यासही ही प्रणाली उपयोगी ठरणार आहे.