मुंबई : यंदाच्या दिवाळीत मुंबईकरांनी आतषबाजी करताना समाजभान राखल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी असल्याची नोंद आवाज फाउंडेशनने केली आहे. गतवर्षी दिवाळीदरम्यान आवाजाची नोंद १२५ डेसिबल एवढी होती, तर यावर्षी ही नोंद ११७ डेसिबल एवढी आहे. महत्त्वाचे म्हणजे रात्री साडेदहानंतर झालेल्या आतषबाजीचे प्रमाणही कमी असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.दिवाळीतील वाढत्या प्रदूषणावर स्वयंसेवी संस्थांसह महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाने जनजागृती केल्यानंतर गेल्या तीन वर्षांत प्रमाण कमी झाले आहे. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यादिवशी कमी आवाजाचे फटाके फोडण्यावर मुंबईकरांनी भर दिल्याचे फाउंडेशनने नमूद केले आहे. या कामी पोलिसांनी सहकार्य केल्याने सकारात्मक बदल झाल्याचेही फाउंडेशनच्या संस्थापक सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ध्वनिप्रदूषण घटले!
By admin | Updated: November 14, 2015 03:21 IST