मुंबईतील उड्डाणपुलांखाली सुशोभिकरण केल्यास बेघर, गर्दुल्ले आणि पार्किंगमाफिया त्याचा दुरुपयोग करणार नाहीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भायखळा विधानसभा उपाध्यक्ष विजय लिपारे यांनी केली आहे. तर उड्डाणपुलाखाली घाणीचे साम्राज्य पसरवऱ्या बेघरांसाठी रात्र निवारे उभारल्यास दुर्गंधीपासून मुक्तता मिळेल, असा दावा बेघरांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने केला आहे.याप्रकरणी लिपारे यांनी सांगितले की, भायखळा ते लालबाग उड्डाणपुलाखालील जागेची दूरवस्था पाहिल्यास शहरातील इतर उड्डाणपुलांच्या अवस्थेचा अंदाज बांधता येतो. याप्रकरणी साहाय्यक पालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. तरी लवकरच उड्डाणपुलाखालील परिसर स्वच्छ करून सुशोभिकरण करण्यात येईल, असे आश्वासन साहाय्यक पालिका आयुक्तांनी दिले आहे. शिवाय तसा प्रस्तावही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र येत्या आठवडाभरात उड्डाणपुलाखालील जागा स्वच्छ झाली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही लिपारे यांनी दिला आहे.याउलट उड्डाणपुलाखालील मोकळ््या जागेत बेघरांसाठी रात्र निवारे उभारल्यास उड्डाणपुलाखालील जागेचा चांगला वापर करता येईल, अशी माहिती स्वयंसेवी संस्थेने दिली आहे. मुंबई महानगरपालिकेने शहरात ११ रात्र निवारे उभारल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात ११ मधील काही रात्र निवारे केवळ कागदावरच आहेत. तर जे रात्र निवारे प्रत्यक्षात आहेत ते पालिकेने स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी दिलेले आहेत. मात्र त्यामध्ये बेघरांना कधीही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्यास ही झोपडपट्टी गायब होईल, असा दावा बेघरांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था करतात.
उड्डाणपुलांखाली रात्र निवारे उभारणे शक्य !
By admin | Updated: April 20, 2015 01:19 IST