Join us

ठाण्यात लवकरच नवीन नऊ सिग्नल

By admin | Updated: May 19, 2014 05:08 IST

शहराचे नागरिकीकरण झपाट्याने होत आहे. तसेच रस्तेही रुंद झाल्याने नागरिकांना ते रस्ते ओलांडणे अवघडच झाले आहेत.

ठाणे : शहराचे नागरिकीकरण झपाट्याने होत आहे. तसेच रस्तेही रुंद झाल्याने नागरिकांना ते रस्ते ओलांडणे अवघडच झाले आहेत. त्यातच वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूककोंडी ही जटिल झाली असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात नव्या नऊ ठिकाणी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव ठाणे वाहतूक शाखेने ठाणे महापालिकेला सादर केला आहे. मुंबईलगतच्या ठाणे शहराच्या लोकसंख्येबरोबर वाहनांचीही संख्या तितकीच वाढत आहे. ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे १८ लाख आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार ठाण्यातील वाहनांची संख्या १५ लाख आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील तीनहात नाका, खोपट, कॅडबरी जंक्शन अशा तीन सिग्नल यंत्रणा वगळता अन्य कुठल्याही चौकांत ही यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे अशा भागांतून चालणे पादचार्‍यांसाठी जिकिरीचे होते. तसेच अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच वाहतूककोंडी, वाहन पार्किंग समस्या निर्माण होऊ लागल्याने नौपाडा, सिव्हिल हॉस्पिटल, घोडबंदर रोड, कळवा, पारसिक नाका, बाळकुम नाका, कापूरबावडी सर्कल, ओवळा इत्यादी महत्त्वाच्या रस्त्यांवर सिग्नलच नसल्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीचा बोजवारा उडतो. विशेष म्हणजे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहने सुरळीत चालावी, यासाठी महत्त्वाच्या रस्त्यांवर दिवसभर काम करतात. मात्र, सर्वच वाहनांना दिशा मार्ग दाखवणे अवघड होऊन जाते आहे. पोलीस कर्मचार्‍यांचे अपुरे मनुष्यबळ, वाहतूककोंडी, वाहतुकीबाबत नागरिकांच्या तक्रारी इत्यादी सर्व बाबींचा विचार करून ठाणे शहरातील क्रीकनाका, सिव्हिल हॉस्पिटल-कामगार चौक, कापूरबावडी सर्कल, बाळकुम नाका, घोडबंदर रोड-विजय गार्डन, लोक हॉस्पिटल-पवारनगर, ओवळा क्रॉस, शिवाजी चौक कळवा आणि टी जंक्शन पारसिक नाका या ठिकाणी नवीन वाहतूक सिग्नल व्यवस्था बसवणे गरजेचे आहे. तसेच ठाणे-भिवंडी बायपास रोडवरून बाळकुम व साकेतकडे जाणार्‍या - येणार्‍या दोन्ही मार्गांवर ब्लिंकर्स बसवण्याचे प्रस्तावात नमूद केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)