नवी मुंबई : ग्रामपंचायतीमधून महापालिकेमध्ये रूपांतर झालेल्या नवी मुंबई महापालिकेने २३ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. अत्याधुनिक मुख्यालयाने शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे. मुलींच्या जन्मदरामध्ये राज्यात अग्रगण्य स्थान मिळाले असून पालिकेस अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून महापालिकेची स्थापना झालेले नवी मुंबई एकमेव शहर. मूळ गावांमधील ग्रामपंचायत कार्यालये, समाजमंदिर व जिल्हा परिषदेच्या शाळा एवढ्याच मालमत्तांच्या आधारावर महापालिकेने वाटचाल सुरू केली. २३ वर्षांमध्ये स्वत:च्या मालकीच्या धरणासह भव्य मुख्यालय व १५६३ मालमत्ता पालिकेच्या मालकीच्या झाल्या आहेत. अल्पावधीमध्ये जवळपास २५ हजार कोटींची स्वमालकीची मालमत्ता असणारी ही एकमेव पालिका ठरली आहे. २०१४ हे वर्षही पालिकेसाठी सकारात्मक ठरले आहे. पामबीच रोडवर भव्य मुख्यालयाचे उद्घाटन वर्षाच्या सुरवातीस झाले. शासनाने एलबीटी सुरू केल्यानंतर राज्यातील सर्व महापालिकांचे उत्पन्न घटले. परंतु नवी मुंबईमध्ये मात्र उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २००२ मध्ये शहरात मुलींचा जन्मदर ८४९ होता तो ९३० वर गेला आहे. राज्यात मुलींचा सर्वाधिक जननदर असल्यामुळे शासनानेही गौरव केला आहे. शहराच्या पुरोगामीत्वावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र शासनाने देशातून निवड केलेल्या ८ आदर्श प्रकल्पामध्ये पालिकेच्या ईटीसी केंद्राचा समावेश झाला आहे. महापालिकेस यावर्षीही अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पाणी पुरवठा व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय नागरी जलपुरस्कार मिळाला आहे. शहरात २६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे वर्षभरात २५० पेक्षा जास्त गुन्'ांचा उलगडा झाला. चोवीस तास फडकणारा २२५ फूट उंच राष्ट्रध्वज मुख्यालयासमोर उभारण्यात आला आहे. यासाठी सिस्को तंत्रज्ञान पुरस्कार पालिकेस प्राप्त झाला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नुकताच इपीसी वर्ल्ड अॅवार्ड पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वर्षभरामध्ये पालिकेच्या कामकाजाला शिस्त आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. लेखा परीक्षणाविषयी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पेपरलेस कामकाज करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या असून नवीन वर्षात मोबाइल अॅप्सचे उद्घाटन करण्यात येणार असून त्यामुळे मोबाइलवरूनही मालमत्ता, पाणीबिल भरता येणार आहे. सिडकोकडून १०२ भूखंडाची हस्तांतर प्रक्रिया सुरू केली असून तीही लवकरच पूर्ण होईल. (प्रतिनिधी)नवी मुंबई महापालिकेच्या २३ वर्षांच्या वाटचालीची माहिती नवी मुंबईकरांना व्हावी यासाठी १ जानेवारीला वाशीतील शिवाजी चौकात चित्र प्रदर्शन ठेवले आहे. पालिकेच्या मालकीच्या १५६३ मालमत्ता आहेत. यामध्ये मोरबे धरण, १९५ उद्याने, ७१ मैदाने, ६८ प्राथमिक व १७ माध्यमिक शाळा, रूग्णालये, समाजमंदिरांचा समावेश आहे. मोरबे धरण परिसरामध्ये तब्बल ११०० एकर जमीन आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये महापालिकेने केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. याविषयीचा प्रवास या प्रदर्शनामधून उलगडण्यात येणार आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केला आहे. शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात पालिकेस यश आले आहे. लवकरच अत्याधुनिक पद्धतीने शहरातील घनकचरा उचलण्यास सुरवात होईल. राज्यात एलबीटीची सर्वात चांगली वसुली नवी मुंबईत झाली आहे. पालिकेला तीन महत्त्वाचे पुरस्कार वर्षभरात प्राप्त झाले असून ईटीसी केंद्राचा देशातील ८ आदर्श प्रकल्पांत समावेश झाला. महापालिकेस आर्थिक शिस्त लावण्यात पालिकेस यश प्राप्त झाले आहे. - आबासाहेब जऱ्हाड, आयुक्त, महापालिका