प्राची सोनवणे, नवी मुंबईजिद्द असेल तर कोणत्याही संकटाला सामोरे जाता येते, हे सानपाडा येथील ऋषभ शिखरे याने सोमवारी सिध्द करून दाखवले. सेक्टर ५ येथे राहणारा ऋषभ शिखरे (१४) कर्करोगाने ग्रस्त आहे. मात्र शिकण्याची जिद्द असल्याने त्याने गंभीर आजारावर मात करून यंदाच्या १० वीच्या परीक्षेस हजेरी लावली आणि त्यात तो उत्तीर्णही झाला. सानपाडा येथील विवेकानंद शाळेत शिकणाऱ्या ऋषभला गतवर्षी नासिकेमध्ये गाठ आढळून आली. याबाबत तपासणी केली असता ही गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले. आॅपरेशन करून ही गाठ काढण्यात आली असली तरी शरीरातील हाडांंमध्ये ही लस पसरू लागली होती. अवघ्या १४ वर्षांच्या या ऋषभला दर तीन आठवड्यांनंतर ५ दिवस केमोथेरपी करावी लागते. सुरुवातीला बांद्रा येथील होली फॅमिली रुग्णालयात त्यानंतर नानावटी रुग्णालयात ते आता वाशीमधील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये ऋषभवर उपचार सुरु आहेत. त्याच्यावर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभचा या आजाराने गंभीर टप्पा गाठला आहे. वर्ष आजारपणात गेल्याने अभ्यासाला तसा फारसा वेळ मिळाला नव्हता तरीही ऋषभने प्रयत्नांची पराकाष्टा सुरूच ठेवली. आई-बाबा, शाळेतील शिक्षकवर्ग, मित्र-मैत्रिणी, मुख्याध्यापिका रश्मी विघ्ने या सगळ््यांनी ऋ षभला त्याच्या लढाईत मोलाची साथ दिली. दहावीची लढाई जिंकल्यानंतर इथेच तो थांबणार नसून यापुढे मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करायचे आहे. पालकांनी आणि शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच ही लढाई जिंकता आली असे तो म्हणाला.लढवय्याचे कौतुकलहान वयातली या लढवय्याची जिद्द पाहून आम्हाला खूप समाधान मिळते. आम्ही वर्षभर त्याला प्रोत्साहन दिले पण ऋषभच्या जिद्दीने, त्याच्या ध्येयाने त्याने ही लढाई जिंकली आहे असेच आम्हाला वाटते. त्याची भविष्यातली सगळी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच पाठीशी उभे राहू.- दीपक शिखरे, ऋषभचे वडील
जिद्दीपुढे कॅन्सरही हरला...
By admin | Updated: June 9, 2015 01:24 IST