Join us  

'हवा येऊ द्या'मधील 'त्या' फोटोवर नेटकरी खवळले; शाहू महाराज, सयाजीरावांच्या अपमानाचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 1:43 PM

 चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी केली आहे

मुंबई - झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही नावे आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. त्यामुळे, या कार्यक्रमातील प्रत्येक एपिसोडला आवर्जुन पाहिलं जातं. या कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यात येते. मात्र, नुकतेच सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या उपस्थितीत 'विजेता' चित्रपटासंदर्भात केलेल्या खास शोमुळे ही चला हवा होऊ द्या टीम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या..च्या त्या एपिसोडवर आक्षेप घेत, हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटीझन्सने म्हटले आहे. तसेच, त्या पार्श्वभूमीवर चला हवा येऊ द्या... आणि डॉ. निलेश साबळे यांचा निषेधही करण्यात आला आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील एका शोमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे नेटीझन्स आणि शाहू महाराजांना मानणारे अनुयायी संताप व्यक्त करत आहेत.  

''चला हवा येऊ द्या सारख्या टुकार कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराजा सयाजीराव गायकवाड तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची विटंबना करण्यात आलेली आहे. आपल्या अतिशय खालावलेल्या विनोदासाठी ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या विकासासाठी, सामाजिक सुधारणांसाठी आपले आयुष्य घालवले अशा महापुरुषांची विटंबना करणे दुर्देवी आहे. झी मराठी वाहिनी आणि बालिश दिग्दर्शक निलेश साबळे यांचा जाहीर निषेध..!''

अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईची आम भाषा मराठी असल्याचं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत म्हटले होते. त्यावर, आक्षेप घेत मनसेनं संबंधित निर्माता आणि कलाकारांना जाब विचारला होता. त्यानंतर, संबंधित निर्मात आणि कलाकारांनी व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितली आहे.  

टॅग्स :चला हवा येऊ द्याशाहू महाराज छत्रपतीमुंबईभाऊ कदम