Join us  

'नक्षली हल्ल्याचं राजकारण करू नका, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणं चुकीचं' 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 5:03 PM

रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना टोला लगावला.

मुंबई - गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात 15 पोलीस जवान शहीद झाले. या नक्षलवादी हल्ल्याचा निषेध रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आला. तसेच, अशा नक्षलवादी हल्ल्यांवरून विरोधी पक्षांनी राजकारण खेळू नये. याउलट विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणे चुकीचे असून सरकाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना टोला लगावला. सरकार कुणाचेही असो नक्षलवादी हल्ल्यासारखी निषेधार्ह घटना घडल्यानंतर जनतेने सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते. नक्षलवादी हल्ल्यांसारखी घटना घडते त्यावेळी सरकार आणि विरोधी पक्षाचा एकच सूर असला पाहिजे. काँग्रेस च्या सत्तेच्या काळातही नक्षलवादी दहशतवादी हल्ले झाले होते. त्यामुळे आता नक्षलवादी हल्ला झाला म्हणून सरकार वर टीका करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागून आपल्यात फूट आहे हे दाखविणे योग्य नाही, असे आठवलेंनी म्हटले आहे. बोरिवली गोराई येथे मानवाधिकार संघटनेतर्फे कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाले. त्यानंतर, माजी संरक्षणमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना जबाबदारीची आठवण करुन दिली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र, आठवलेंनी राजीनामा मागणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :रामदास आठवलेनक्षलवादीदेवेंद्र फडणवीसशरद पवार