मुंबई : अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी स्थानिक नेते जोमाने कामाला लागले आहेत. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असून, ते मोडीत काढण्यासाठी शिवसेना जोमाने कामाला लागली असल्याने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध महायुती अशी लढत रंगणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळविण्यासाठी विविध पक्षांतील इच्छुकांनी पक्षनेतृत्वांकडे फिल्डिंग लावली आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची सेना, भाजपा आणि मनसेतील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला आहे, तर सेना-भाजपा युतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाला आहे. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नवाब मलिक यांनी विजय मिळवला होता. त्यांना शिवसेनेचे विभाग अध्यक्ष तुकाराम काते यांनी कडवी झुंज दिली, परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव जिव्हारी लागल्याने तुकाराम काते पुन्हा आगामी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तसेच शिवसेनेचे सूर्यकांत महाडिक, बबलू पांचाळ, सुबोध आचार्य आणि प्रमोद शिंदे हे नेतेही इच्छुक आहेत. परंतु तुकाराम काते हे विद्यमान खासदारांच्या जवळचे मानले जात असल्याने महायुतीकडून त्यांनाच उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा स्थानिक नेत्यांमध्ये सुरू आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाट होती. मनसेकडून या ठिकाणाहून नवीन आचार्य यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना चांगली मते मिळाल्याने आचार्य पुन्हा आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत, तर भाजपाकडून विठ्ठल खरटमोल हे इच्छुक असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
या मतदारसंघात बौद्ध, मुस्लीम मतदार मोठय़ा संख्येने राहतात. तसेच दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय मतदारही वास्तव्यास आहेत. ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेचा फायदा विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना झाला. या विधानसभा मतदारसंघातून शेवाळे यांना 59 हजार 72 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांना 49 हजार 21 मते मिळाली आहेत. 2009 साली शिवसेनेने युतीच्या बळावर निवडणूक लढविली होती. परंतु सध्या युतीला रिपाइंची सोबत मिळाल्याने येत्या निवडणुकीत महायुती आणि राष्ट्रवादी यांच्यामध्येच प्रमुख लढत रंगणार आहे. (प्रतिनिधी)
2009 विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते
च्राष्ट्रवादी -आमदार नवाब मलिक - 38,928
च्शिवसेना - तुकाराम काते -32,103
च्मनसे - नवीन आचार्य - 16,737
च्आरपीआय - गौतम सोनावणो - 7,274