Join us  

राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करणारं दाम्पत्य करतंय स्वतःच्याच हत्येचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:47 AM

या दाम्पत्याने आता स्वतःच्या हत्येची योजना आखली आहे.

मुंबई-  काही दिवसांपूर्वी चर्नी रोड येथील एका वृद्ध दाम्पत्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. नारायण लवाटे आणि इरावती लवाटे अशी या दोघांची नावे आहेत. नारायण लवाटे हे  86 वर्षांचे तर इरावती लवाटे या 79 वर्षांच्या आहेत. राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करून त्यावर काहीही उत्तर न आल्याने या दाम्पत्याने आता स्वतःच्या हत्येची योजना आखली आहे. इरावती यांनी स्वतःच्या पतीला पत्र लिहून स्वतःला संपविण्याची मागणी केली आहे. पत्नीला मारल्यानंतर पतीलाही मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल, असं त्यांचं मत आहे. 

हे दाम्पत्य दक्षिण मुंबईतील चर्नीरोडजवळच्या ठाकुरद्वारमध्ये राहतं. या दाम्पत्याला मुलं नाहीत तसंच कुठला गंभीर आजारही नही. वयानुसार समाजासाठी आपला काहीही उपयोग नसून स्वतःचा सांभाळ करण्यासाठी आपण आता सक्षम नाही, असं या दाम्पत्याला वाटतं आहे. नर्स अरूणा शानबाग यांना इच्छामरण मिळावं, यासाठी केईएम हॉस्पिटलने दया याचिका दाखल केली होती. ते वाचून या दाम्पत्याने इच्छामरणाचा विचार केला होता. 

21 डिसेंबर रोजी या दाम्पत्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केल होती. 31 मार्च 2018पर्यंत उत्तराची वाट पाहू, असं या जोडप्याने पत्रात नमूद केलं होतं. पण पत्र पाठवून दोन महिने उलटत असून त्यांचं पत्र गांभिर्याने घेतलं नसल्याने त्यांनी एकमेकांच्या हत्येची योजना आखली आहे. 

इरावती यांनी पती नारायण यांना मार्मिक पत्र लिहिलं आहे. 31 मार्चनंतर मला गळा दाबून मारू शकता,त्यानंतर तुम्हालाही मृत्यूदंडाची शिक्षा होईल, असं इरावती यांनी पत्रात लिहिलं आहे. आपण दोघांनीही इच्छामरणाची मागणी केली आहे. पण आपली मागणी राष्ट्रपती ऐकणार नाही, असं मला वाटतं. यामुळे 3 मार्चनंतर तुम्ही मला गळा दाबून मारू शकता, हाच एक पर्याय मला दिसतो आहे. मला मारणं ही एक योजनापूर्ण हत्या असेल ज्यामुळे कोर्ट तुम्हाला गुन्हेगार ठरवून फाशीची शिक्षा देईल, असं इरावती यांनी पत्रात लिहिलं आहे. लग्नाच्या पहिल्याच वर्षी लवाटे दाम्पत्यानंमूल जन्माला घालायचे नाही, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना कुणीही वारस नाही. अनेक वर्षे सोबत सुखाने जगलो आता आम्हाला सोबत मृत्यू मिळावा म्हणून आम्ही इच्छा मरणाची मागणी केली आहे असे या दोघांनी म्हटलं. इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून हे दाम्पत्य 30 वर्षे पाठपुरावा करतं आहे. नारायण लवाटे हे एस.टी. महामंडळाच्या अकाऊंट विभागात कार्यरत होते. तर इरावती लवाटे या गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. आता दोघेही गिरगावातील ठाकूरद्वार भागात असलेल्या चाळीत राहतात. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ केली, आता मृत्यूदेखील सोबत यावा, अशी इच्छा या दोघांनीही व्यक्त केली होती.