Join us  

नाणारचा तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये कधी होणारच नव्हता - सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 7:37 AM

त्या भागातील लोकांच्या हिताचा विचार करुन नाणारमध्ये हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली होती. आमच्या दबावामुळेच आधीच्या सरकारला तो प्रकल्प रद्द करावा लागला.

यदु जोशी

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्याच्या नाणारमधील तेल शुद्धिकरण प्रकल्प केव्हाच रद्द केलेला आहे. तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात कधीही होणार नव्हता त्यामुळे आता तो रायगडमध्ये रद्द केल्याची आवई उठविणे चुकीचे असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.

त्या भागातील लोकांच्या हिताचा विचार करुन नाणारमध्ये हा प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली होती. आमच्या दबावामुळेच आधीच्या सरकारला तो प्रकल्प रद्द करावा लागला. आता तर आमचेच सरकार आहे. असे असताना तेल शुद्धिकरण प्रकल्प अन्यत्र उभारण्याची भूमिका घेणे शक्य नाही. आधीही आम्ही ही भूमिका कधीच घेतलेली नव्हती. आधीच्या सरकारने वा आताच्याही सरकारने सदर प्रकल्प नाणारमधून रायगड जिल्ह्यात स्थानांतरित करण्याची साधे सुतोवाचदेखील कधी केले नव्हते, केवळ माध्यमांमधून तशा बातम्या आल्या, असे देसाई म्हणाले.

रायगडनजीक फार्मास्युटिकल हबदेशात तीन मोठे फार्मास्युटिकल हब उभारण्याची केंद्राची योजना आहे. त्यातील एक हब हा रायगडनजीक उभारला जाणार आहे. या हबसाठी सिडकोने संपादित केलेल्या जमीन देण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाने दिलेला आहे. रोहा आणि मुरुड तालुक्यातील नवनगरासाठीचे अधिसूचित क्षेत्र वगळण्यात आले आहे. सिडकोची नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमणूकही रद्द केल्याचे देसाई यांनी सांगितले.

ती जमीन सिडकोसाठीनाणारचा प्रकल्प रायगडमध्ये होणार होता आणि आता तो सरकारने रद्द केल्याच्या बातम्या मी वाचतोय. मुळात रायगडमधील ज्या जमिनीचा उल्लेख केला जातोय ती सिडकोने तेल शुद्धिकरण प्रकल्पासाठी नव्हे; तर नवनगराच्या उभारणीसाठी संपादित केली. तेल शुद्धिकरण प्रकल्पाचा या भूसंपादनाशी कोणताही संबंध नव्हता, असे देसाई म्हणाले. 

टॅग्स :नाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पसुभाष देसाईशिवसेनारायगड