- चेतन ननावरे, मुंबईमतदार यादीतील नावे वगळण्याच्या प्रक्रियेला जिल्हा निवडणूक आयोगाने सुरुवात केली असून मुंबईतील एकूण मतदारांपैकी १० टक्के मतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीस बजावलेल्या यादीत मतदार यादीत छायाचित्र नसलेले, स्थलांतरित आणि मृत म्हणून नोंद झालेल्या मतदारांचा समावेश आहे.मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत एकूण २४ लाख ६६ हजार ७०५ मतदारांची नोंद शासन दफ्तरी आहे. त्यातील २ लाख ४६ हजार ७११ मतदारांना जिल्हा निवडणूक आयोगाने नोटिसा पाठवल्या आहेत. त्यात मतदार यादीत छायाचित्रे नसलेल्या, मृत पावलेल्या आणि स्थलांतरित मतदारांची नावे असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाने सांगितले. योग्य वेळेत मतदाराने नोटीसला उत्तर दिले नाही, तर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात येईल.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीत छायाचित्र नसल्यास बोगस मतदान होण्याची शक्यता असते. त्यामुळे नोटीस पाठवली आहे. तर एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याचे कुटुंबीय तशी नोंद करतात. मात्र खरेच व्यक्ती मृत पावली आहे की नाही, याची शहानिशा करावी लागते. शिवाय एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित झालेल्या व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या यादीत येता कामा नये, याची काळजीही घ्यावी लागते. त्यामुळे नोटीस पाठवलेल्या व्यक्तींनी घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ योग्य ते पुरावे घेऊन नोटीसचे उत्तर देणे अपेक्षित आहे. मात्र नोटीसला कोणतेही उत्तर आले नाही, तर नियमानुसार कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करून मतदार यादीतील नाव वगळण्यात येईल.कशी असेल नाव वगळण्याची प्रक्रिया?आयोगाचा केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नोटीस बजावलेल्या मतदाराच्या घरी जाऊन चौकशी करेल.तीन वेळा बीएलओ पाहणी करून गेल्यावर संबंधित मतदार आढळला नाही, तर तसा पंचनामा केला जाईल.पंचनामा करून बीएलओ आयोगाकडे अहवाल सादर करेल.त्यानंतरही मतदाराने म्हणणे मांडले नाही, तर नाव वगळण्याची एक यादी तयार केली जाईल.वगळण्यात येणाऱ्या नावांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. शिवाय वर्तमानपत्रातही त्याची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.ठरावीक काळातही कोणीही आक्षेप घेतला नाही, तर नावे वगळली जातील. (वगळण्यात येणाऱ्या नावांची यादी स्थानिक राजकीय प्रतिनिधींना पाठवण्यात येते.)मतदारांना आवाहनमतदार यादीतून वगळण्यात येणाऱ्या मतदारांच्या नावाची यादी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. तरी मतदारांनी स्थानिक निवडणूक कार्यालयात आपल्या नावाची शहानिशा करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले. मतदार नोंदणीचे काम वर्षभर सुरू असल्याने नाव वगळलेल्या मतदारांना पुन्हा मतदार नोंदणी करण्याची संधी असल्याचे आयोगाने सांगितले.
दोन लाख मतदारांची नावे वगळणार!
By admin | Updated: August 25, 2015 05:17 IST