Join us

नालेसफाई ६० टक्के पूर्ण; पालिकेचा दावा

By admin | Updated: June 3, 2015 23:02 IST

शहरातील छोट्या-मोठ्या १५३ नाल्यांच्या सफाईला १६ मे रोजी सुरुवात झाल्यानंतर आजमितीस सुमारे ६० टक्के सफाई झाल्याचा दावा पालिकेने केला

भार्इंदर : शहरातील छोट्या-मोठ्या १५३ नाल्यांच्या सफाईला १६ मे रोजी सुरुवात झाल्यानंतर आजमितीस सुमारे ६० टक्के सफाई झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. नालेसफाईला १६ जूनची डेडलाइन दिली असली तरी ती १० जूनपर्यंतच आवरती घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत आहे. यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. तत्पूूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण होण्याचे अपेक्षित असताना यंदा मात्र त्याला विलंबाने सुरुवात झाली आहे. नालेसफाईच्या आर्थिक प्रस्तावाला स्थायीने १५ मे च्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर १६ मे रोजी तिला सुरुवात झाली आहे. त्यासाठी दीड कोटीच्या खर्चाला मान्यता दिली असून ती १२ कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. ही सफाई १६ जूनपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन नियुक्त ठेकेदाराला दिली असली तरी ती उशिराने सुरू झाल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. परंतु, ही सफाई १६ जूनऐवजी १० जूनलाच पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी ७ पोकलेन मशीन, बोटींसह ३ पोकलेन मशीन, ४ हायड्रो मशीन, २ क्रेन, ४०० सफाई कर्मचारी, १२ जेसीबी, ३० डम्पर आदी सफाईच्या साहित्याचा युद्धपातळीवर राबता असून त्यावर स्वच्छता निरीक्षकांसह कनिष्ठ अभियंत्यांमार्फत नियंत्रण ठेवले जात आहे. त्याचा दैनंदिन अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येत असून प्रसंगी सफाईचा आँखो देखा हाल आयुक्तांकडून तपासला जाणार आहे. दरम्यान, शहरातील प्रभाग क्र. ३८ अ येथील पोटनिवडणुकीसह वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी स्वच्छता विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने शहरातील नालेसफाई चांगलीच लटकण्याची शक्यता आहे. उपायुक्त (मुख्यालय) गणेश देशमुख यांनी सांगितले की, यंदाच्या नालेसफाईला विलंब झाला असून ती योग्य रीतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही ती सुरू राहण्याची शक्यता असली तरी ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.