ठाणे : मान्सूनच्या कालावधीत कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये यासाठी आयुक्तांनी सर्व विभागांच्या बैठका घेऊन ३१ मे पर्यंत नाले सफाई, अतिधोकादायक इमारती आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु, २ जून उजाडला तरी देखील शहरातील नालेसफाईची कामे ७३ टक्के झाली असून, अतिधोकादायक ५८ इमारतींपैकी केवळ १० इमारतींवर हातोडा पडला आहे. तसेच ०७ इमारती खाली केल्या आहेत. तर ३४६९.०२ चौरस मीटर रस्त्यांपैकी केवळ २१४० चौरस मीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १५ मे नंतर रस्ते खोदाईला परवानगी देऊ नका, असे आदेश असतांना सुद्धा शहरात आजही विविध ठिकाणी सर्रासपणे रस्ते खोदाईची कामे सुरु आहेत.मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मागील महिन्यात बैठक घेतली होती. त्यानंतर नालेसफाईच्या कामांना वेग असला तरीदेखील जी डेड लाईन देण्यात आली होती. ती दरवर्षी प्रमाणे यंदाही पाळली गेलेली नाही. १ जूनपर्यंत शहरातील ७३ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती पालिकेने दिली. ११३७८.१ घनमीटर काढलेल्या गाळापैकी ९०२७ घनमीटर गाळ उचलण्यात आला असून, अद्यापही २६९१.३ घनमीटर गाळ उचलणे शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु येत्या ४८ तासात हा गाळ संपूर्णपणे हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी संबधितांना दिले आहेत. विशेष म्हणजे कळवा आणि मुंब्रा समितीत आजघडीला केवळ ६५ टक्केच नालेसफाई झाली आहे. याबाबत सारेच मौन पाळून आहेत.(प्रतिनिधी)
नालेसफाई रखडलेलीच
By admin | Updated: June 3, 2015 04:29 IST