Join us  

संगीत नाटकांना पुन्हा एकदा चांगले वैभव प्राप्त करुन देऊ - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 11:07 PM

 संगीत नाटक निर्मितीची संख्या कमी होत चालली आहे. आजच्या युवा पिढीपर्यंत संगीत नाटके पोहचविण्याची आवश्यकता असून आपण संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करुन संगीत नाटकांना पुन्हा एकदा चांगले वैभव प्राप्त करुन देऊ.

मुंबई : संगीत नाटक निर्मितीची संख्या कमी होत चालली आहे. आजच्या युवा पिढीपर्यंत संगीत नाटके पोहचविण्याची आवश्यकता असून आपण संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करुन संगीत नाटकांना पुन्हा एकदा चांगले वैभव प्राप्त करुन देऊ. सरकार म्हणून संगीत नाटकांना नक्कीच मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि ज्या नाट्यगृहांमध्ये संगीत नाटकांचे प्रयोग ठेवण्यात येतील ते नाट्यगृह संगीत नाटकांसाठी मोफत देण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज दिले.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार श्री. बाबा पार्सेकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी श्री. लीलाधर कांबळीयांच्या हस्ते तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार श्रीमती निर्मला गोगटे यांना ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती रजनी जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी बोलताना श्री. तावडे म्हणाले की, आज ज्या रंगकर्मीना शासनाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्या ज्येष्ठ कलाकारांचे या क्षेत्रातील योगदान अतिशय अमूल्य असे आहे. म्हणूनच असे जीवनगौरव पुरस्कार राजकारण्यांचे हस्ते न देता याच क्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते देण्याची परंपरा आम्ही सुरु केली. हे पुरस्कार म्हणजे कलाकारांच्या कलेचा खऱ्या अर्थाने सत्कार आहे, असे मी मानतो.सध्या संगीत नाटकांची संख्या कमी होत चालली आहे. या संगीत नाटकांना त्यांचे जुने वैभव प्राप्त करुन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने संगीत नाट्य क्षेत्रातील कलाकार, निर्माते यांची एक नुकतीच बैठक पार पडली. या चर्चेनुसार येत्या काही महिन्यांमध्ये शासन नाट्य परिषदेच्या सहकार्याने संगीत नाटक निर्मितीसाठी नक्कीच भर देईल.संगीत नाट्य लेखकांची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. या कार्यशाळेत आयोजित ज्येष्ठ रंगकर्मींचे मार्गदर्शन करण्यात येईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.आजच्या युवापिढीसाठी संगीत नाटक कमी होऊ लागली आहेत, त्यामुळे नवीन पिढीसमोर संगीत नाटकांची निर्मिती करण्याच्याद्ष्टीने संगीत नाटक निर्मितीला शासन म्हणून मदत करण्यात येईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले. याप्रसंगी पुरस्कार विजेते बाबा पार्सेकर आणि निर्मला गोगटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शासनाचे आभार मानले. आमच्या कलेचा सरकारने खऱ्या अर्थाने गौरव केला असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी आमदार प्रविण दरेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

- सध्या राज्य नाट्य स्पर्धा १९ केंद्रावर सुरु आहेत. या स्पर्धेसाठी काही जुने नियम आहेत. ज्या नाट्य केंद्रावर नाट्य संस्थेचे १५ पेक्षा कमी प्रवेश आले आहेत, अशा केंद्रावर एकच नाटक अंतिम स्पर्धेसाठी निवडले जात होते. परंतु आता आधिकाधिक नाटकांना आणि त्यांच्या कलेला संधी देण्याच्या दृष्टीने ज्या नाट्य केंद्रावर नाट्य स्पर्धेसाठी १५ प्रवेशांपेक्षा अधिक नाट्य संस्थेचे प्रवेश आले असतील त्या नाट्य केंद्रावर अंतिम फेरीसाठी एक ऐवजी २ नाटके अंतिम फेरीसाठी निवडण्यात येतील असेही, श्री. तावडे यांनी घोषित केले. 

टॅग्स :मुंबई