मुरुड : समुद्रकिनाऱ्यावरील भरती, ओहोटीच्या सततच्या तडाख्यामुळे दगडी बंधारा कमकुवत झाल्याने समुद्राचे पाणी आत शिरण्याचा धोका संभवतो. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची विशेष दुरुस्ती न झाल्यास किनाऱ्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या सुरुच्या निबीड वनाला धोका होऊ शकतो. तेव्हा मेरीटाईम बोर्डाने वेळीच सतर्क होऊन विशेष दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मुरुडच्या जि.प. गेस्ट हाऊस ते गोल्डन स्वॉन रिसॉर्टच्या पश्चिमेस असलेला सुमारे १५० मीटर्सचा दगडी बांध लाटांच्या माऱ्यांमुळे दिवसेंदिवस खचत असून दगड सुटू लागले आहेत. परिणामी भरतीच्या पाण्यामुळे किनाऱ्यावर असलेली काही सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत.याच विशिष्ट टापूत सुरुच्या झाडांवर निवाऱ्यासाठी स्थिरावलेली वटवाघुळांची शाळा हजारोंच्या संख्येने एकत्रितपणे बघण्याची गंमत पर्यटकांना मोहित करते. दगडी बंधाऱ्याची दुरुस्ती वेळेवर न झाल्यास किनारा विद्रूप होईल आणि उरलीसुरली झाडेही नष्ट होण्यास मदत होईल. तेव्हा मेरीटाईम बोर्डाने पर्यावरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वृक्षसंवर्धनास हातभार लावावा आणि विशेष पाहणी करून धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची विशेष दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
मुरुडमध्ये सुरुच्या झाडांना धोका
By admin | Updated: June 6, 2015 22:29 IST