Join us  

महापालिकेचा ‘नौकाविहार’, आयुक्तांनी घेतला कामाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:53 AM

पाणी तुंबण्याच्या ठिकाणी १२ जीवरक्षक तराफे : आयुक्तांनी घेतला कामाचा आढावा

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका यंत्रणा व्यस्त राहिल्यामुळे पावसाळापूर्व कामे लांबणीवर पडली आहेत. परिणामी, भौगोलिक स्थितीमुळे पूरपरिस्थितीचा धोका असलेल्या १२ विभागांना प्राधान्याने २० जीवरक्षक तराफे तयार ठेवण्यात आले आहेत. तसेच मुंबई अग्निशमन दलाच्या पूर प्रतिसाद पथकाचे १६० अधिकारी व कर्मचारी, लष्कराच्या सहा तुकड्या, नौदलाची पूर बचाव पाच पथके, तटरक्षक दलाची चार पथके आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. इतकी वर्षे होऊनही पाणी तुंबण्यावर पालिका तोडगा काढू शकली नाही़ त्यामुळे या तरफा नौका विहारासाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़

येत्या ४८ तासांमध्ये मुंबईत पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज मुंबई हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाळापूर्व कामांचा आढावा पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी शुक्रवारी घेतला. या बैठकीत सर्व पावसाळापूर्व कामांची झाडाझडती घेण्यात आली. या वेळी पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या डी (ग्रँट रोड, वाळकेश्वर), एफ उत्तर (सायन, माटुंगा), जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी), के पूर्व (जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व), के पश्चिम (अंधेरी प. विले पार्ले प.), एल (कुर्ला), एम पश्चिम (चेंबूर), पी उत्तर (मालाड), पी दक्षिण (गोरेगाव), आर दक्षिण (कांदिवली), एस (भांडुप) व टी (मुलुंड) या विभागांना प्राधान्याने जीवरक्षक तराफे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.पालिकेच्या सर्व २४ वॉर्डमध्ये अद्ययावत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मुंबईभरातील स्थितीवर नजर ठेवण्यासाठी ५२५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच पालिकेचा परळ येथील बॅक अप आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. सहा मोठी रुग्णालये, २२ बाह्य यंत्रणांना जोडणाऱ्या ५२ हॉटलाइन सुरू करण्यात आल्या आहेत.१३४ शाळांमध्ये आश्रयपाणी तुंबू नये याची खबरदारी घेण्यासाठी २९९ ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत स्थलांतर करण्यासाठी २० जीवरक्षकांच्या टीम तैनात आहेत. शिवाय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास १३४ शाळांमध्ये तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.च् पालिकेच्या ‘डिजास्टर मॅनेजमेंट एमसीजीएम’ मोबाइल अ­ॅपवर नागरिकांना आपत्कालीन स्थितीत घ्यावयाची काळजी आणि संपर्क कुठे करावा याचीही सविस्तर माहिती मिळणार आहे.1संभाव्य पूरपरिस्थितीदरम्यान आवश्यक असणारी जीवसंरक्षक सामग्री वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला कमानी, चेंबूर मरोळ व बोरीवली येथील अग्निशमन केंद्रांवर तैनात ठेवण्यात आली आहे.2लष्कराच्या सहा तुकड्यांमध्ये जवान व अधिकारी मिळून ४५ सैनिक आहेत. याप्रमाणे एकूण २७० जवान कार्यतत्पर आहेत. या तुकड्यांमधील बहुतेक सर्वच सैनिक जलतरणपटू आहेत. तसेच ६ बोटी, ३ ओबीएम व ८० लाइफ जॅकेट्स उपलब्ध आहेत.3कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची पाच पूर बचाव पथके तैनात आहेत. एक पाणबुडी पथक कुलाबा येथे तर दोन पथके उरण येथे तैनात आहेत. कुलाबा येथे चेतक व सी-किंग नावाचे हेलिकॉप्टर मदतीकरिता तत्पर आहे. बचाव कार्यासाठी एक स्वतंत्र जहाज तैनात आहे.4भारतीय तटरक्षक दलाच्या चार पथकांत प्रत्येकी चार सदस्य आहेत. ही पथके कुलाबा, वरळी व मानखुर्द येथे तैनात आहेत. वरळी येथील नियंत्रण कक्ष मुख्य आपत्कालीनकक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडेला आहे.5राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकड्या अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत.

टॅग्स :मुंबई