ठाणे : प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती करण्याचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला असतानाच आता त्यापुढेही जाऊन शहरात प्रतिदिन निर्माण होणारा ५० टनांहून अधिक हरित कचरा एकत्रित करून त्यापासून जळाऊ इंधन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करण्याची तयारी ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. हा प्रकल्प सुरू झाला तर ठाणे महापालिका ही राज्यातील अशा प्रकारचा प्रकल्प उभारणारी पहिली महापालिका ठरणार आहे.ठाणे शहरात आजघडीला साधारणपणे रोज ५० टन हरित कचरा निर्माण होत आहे. यामध्ये वृक्ष, झाडांच्या फांद्या, पाने, गवत आदींचा यात समावेश आहे. सध्या ठाणे महापालिका हरित कचऱ्याची तीन पद्धतीने विल्हेवाट लावत आहे. हा कचरा क्षेपणभूमीवर टाकला जातो. तर, गृहसंकुलांत हा कचरा जाळून अडगळीच्या ठिकाणी टाकला जात आहे. परंतु, शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने घंटागाडीतील जागा अडविल्याने मुख्य कचरा उचलण्यास अडथळे येऊन लाखो रुपये अशा हरित कचऱ्याच्या ने-आण करण्यावर खर्च होत आहे. तो कचरा जाळल्याने हवा प्रदूषित होऊन दुर्गंधी पसरत आहे. तो फेकल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळेच आता त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन पालिकेने समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने कोपरी येथील मलनि:सारण केंद्रावरील निर्माल्य व्यवस्थापन प्रकल्पावर हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)
महापालिका राबविणार वूड वेस्ट टू एनर्जी प्रकल्प
By admin | Updated: September 6, 2015 00:56 IST