Join us

धारावीतील उड्डाणपुलाकडे पालिकेचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 21, 2015 02:29 IST

सायन-माहीम लिंक रोडवरील उड्डाणपुलाचा काही भाग खचून चार वर्षे लोटली तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे

मुंबई : सायन-माहीम लिंक रोडवरील उड्डाणपुलाचा काही भाग खचून चार वर्षे लोटली तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे महापालिकेने कानाडोळा केला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतरही पुलाचे काम मार्गी लागत नसल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.धारावीतील केमकर चौकाजवळील सायन-माहीम लिंक रोडवरील ६0 फूट नाल्यावर असलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग ६ आॅगस्ट २0११ रोजी खचला. या घटनेत दोन वाहने खड्ड्यात पडली. या घटनेला चार वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अद्यापपर्यंत या उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या उड्डाणपुलावरील उत्तरेकडील भागावरून जाणारी वाहतूक बंद करून ती दक्षिणेकडील भागावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे माहीम खाडीच्या जवळील बाजूने होणारी वाहतूक बंद झाली आहे.उड्डाणपुलावरील वाहतूक एका दिशेने बंद केल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तसेच बंद केलेल्या मार्गावर स्थानिकांकडून वाहने उभी करण्यात येत आहेत. या वाहनांच्या मागे स्थानिक नैसर्गिक विधी करीत असल्याने येथे दुर्गंधी पसरू लागली आहे. माहीम आणि सायन बीकेसीकडे जाण्यासाठी हा मार्ग सोईचा असल्याने अनेक वाहने या मार्गावरून जातात. परंतु येथे वाहतूक कोंडी होत आहे. उड्डाणपूल तातडीने दुरुस्त करावा, यासाठी काँग्रेसच्या दक्षिण मध्य जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय भालेराव पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, महापालिकेकडून याची दखल घेण्यात येत नसल्याने भालेराव यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.