मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून २० टक्के पाणीकपात लागू केली असली तरी दुसरीकडे महापालिकेत या पाणीकपातीहून राजकारण रंगले आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीकपातीच्या प्रस्तावावर चर्चाच झाली नाही. परिणामी, पाणीकपातीला विरोध नाही,मात्र पाणीकपातीवर चर्चा होणे गरजेचे होते, असे म्हणत गटनेत्यांनी सत्ताधारी वर्गासह प्रशासनावर तोफ डागली.विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या म्हणण्यानुसार, स्थायी समितीच्या बैठकीत पाणीकपातीच्या मुद्द्यांवर चर्चाच झाली नाही. जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, इमारतीसाठी जलनियोजन करणे, उर्वरित जलस्रोतांबाबत उपाययोजना करणे, असे अनेक मुद्दे आम्ही बैठकीत मांडणार होतो. चर्चाच होत नसेल तर उपाययोजना समोर कशा येणार, हाही प्रश्नच आहे. समाजवादी पक्षाचे गटनेते रईश शेख यांनी सांगितले की, बैठकीत पाणीकपातीच्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही म्हणून आम्ही निषेध केला. मनसेचे गटनेत संदीप देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, जलनियोजनासाठी संबंधितांनी वर्षभर काहीही केलेले नाही. पाऊस पडला नाही म्हणजे पाणीकपात करणे हा उपाय नाही. पाणीकपात होऊ नये म्हणून गतवर्षीच नियोजन करणे गरजेचे होते. मात्र त्या वेळीही प्रशासनाने हालचाली केलेल्या नाहीत.काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी सांगितले, की बैठकीत पाणीकपातीचा प्रस्ताव येत असेल तर त्यावर चर्चा होणे, मुद्दे मांडणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या १० टक्के पाणीकपात आहे. मग आता लादण्यात आलेल्या २० टक्के पाणीकपातीमुळे ती थेट ३० टक्क्यांवर पोचली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी सांगितले, की पाणीगळतीसह उर्वरित मुद्दे मांडायचे होते; मात्र चर्चा झाली नाही ही खंत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी पाण्याचे राजकारण करू नये, असे भाजपा नेते मनोज कोटक म्हणाले. (प्रतिनिधी)
महापालिकेत पाणी पेटले !
By admin | Updated: August 27, 2015 03:21 IST