मुंबई : आयसीएसई दहावी आणि आयसीएस बारावी (दिल्ली बोर्ड) निकाल सोमवारी जाहीर झाला. आयसीएसईचे तब्बल ९८.४९ टक्के तर आयएससीचे ९६.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. देशात प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांपैकी मुलींमध्ये विलेपार्ले येथील सी.एन.एम. शाळेची अनन्या पटवर्धनने प्रथम क्रमांक पटकावला. तर नवी मुंबईतील सेंट मेरी शाळेचा तेझान साहू मुलांमध्ये अव्वल ठरला. दोघांनाही ९९.२० टक्के गुण मिळाले. राज्यातील ९९.७२ टक्के विद्यार्थी आयसीएसईला उत्तीर्ण झाले. आयसीएसईत तिसऱ्या क्रमांकावर मुंबईच्या तब्बल पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यामध्ये तन्मय चोप्रा (९८.८० टक्के), आनिश दीक्षित (९८.८० टक्के), मनीष जैन (९८.८० टक्के), विवेक धवनील (९८.८० टक्के) आणि अविशा शहा (९८.८० टक्के) यांचा समावेश आहे. तर पुणे येथील अभ्रनिल चक्रबर्ती याने ९८.८0 टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यंदा आयसीएसईला देशभरातून १ लाख ५८ हजार ८३३ विद्यार्थी बसले होते. तर आयएससीची ७१ हजार १४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मुलींची बाजी : यंदाही मुलींनी निकालावर वर्चस्व कायम राखले आहे. आयसीएसई बोर्डाच्या निकालात मुलींचा निकाल ९८.९५ टक्के लागला. तर मुलांचा निकाल ९८.१२ टक्के लागला आहे. महाराष्टातून आयसीएसई परीक्षेत ९९.७२ टक्के तर आयएससी परीक्षेत ९८.८0 टक्के विद्यार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या दोन्ही परीक्षेत मुलींनी बाजी मारली. आयसीएसई परीक्षेत ९९.७७ टक्के मुली पास झाल्या असून ९९.६९ टक्के मुले पास झाली आहेत. तसेच आयएससी परीक्षेत ९९.२७ टक्के मुली आणि ९८.३२ टक्के मुले पास झाली आहेत. आयसीएसई परीक्षेला राज्यातून १५ हजार १२0 आणि आयएससी परीक्षेला २ हजार १६२ विद्यार्थी बसले होते.परीक्षेत यश मिळण्याची अपेक्षा होती, मात्र देशात प्रथम येईल, असे वाटले नव्हते. देशात पहिली असल्याने आश्चर्याचा धक्का बसल्याचे अनन्याने सांगितले.परीक्षेसाठी चांगली तयारी केली होती. पेपरही सोपे गेले होते. त्यामुळे परीक्षेत चांगले यश मिळेल असा विश्वास होता. पण निकालाने आनंद झाला असल्याचे तेझान साहू याने सांगितले.