Join us  

मुंबई विद्यापीठाचा 'हा' सावळागोंधळ पाहून तुम्ही हात जोडाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 9:30 AM

आता विद्यापीठाने पदवीत्तोर परीक्षांच्या वेळापत्रकात घोळ घालून आपला 'लौकिक' कायम राखला आहे. 

मुंबई: भोंगळ कारभारावरूनही वाभाडे निघाल्यानंतरही मुंबई विद्यापीठाचे प्रशासन काही सुधारायला तयार नाही. काही महिन्यांपूर्वीच परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाचे कान उपटले होते. मात्र, त्यानंतर विद्यापीठाच्या भोंगळ कारभारात तसूभरही फरक पडलेला नाही. त्यानंतर आता विद्यापीठाने पदवीत्तोर परीक्षांच्या वेळापत्रकात घोळ घालून आपला 'लौकिक' कायम राखला आहे. या घोळामुळे एका विद्यार्थिनीला परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास सोडून वेळापत्रकात बदल करून घेण्यासाठी धावाधाव करावी लागली. प्रशासनाचा रोष ओढवून घेण्याच्या भीतीने या विद्यार्थिनीने आपले नाव उघड करण्यास नकार दिला. मात्र, उपलब्ध माहितीनुसार, ही विद्यार्थिनी समाजशास्त्रात एम.ए. करत आहे. पदवीत्तोर अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तिने मानसशास्त्र विभागातील 'चेंज मॅनेजमेंट' हा विषयही अभ्यासासाठी निवडला आहे. मात्र, विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार क्वांटिटेटिव्ह रिसर्च आणि चेंज मॅनेजमेंट या दोन्ही विषयांची परीक्षा आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता आहे. या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या केंद्रांवर आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनीसमोर मोठा पेच उभा राहिला होता. तिने ही गोष्ट विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही दिली. मात्र, विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांकडून तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अगदी कालपर्यंत ही विद्यार्थिनी अभ्यास सोडून विद्यापीठात खेटे घालत होती. तिने तब्बल पाच तास घालवून परीक्षेची वेळ बदलण्याची मागणी केली. मात्र, तिला कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला विचारण्यात आले असता आम्ही 15 दिवसांपूर्वीच वेळापत्रक जाहीर केल्याचे सांगितले. मात्र, आम्ही या समस्येवर नक्कीच तोडगा काढू. संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी हमी विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :शैक्षणिकमुंबई विद्यापीठ