Join us  

Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकल 20 मिनिटे उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 9:00 AM

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 20 मिनिटे उशीराने धावत आहेत.

ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल 15 ते 20 मिनिटे थांबल्या असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (11 जून) विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल 15 ते 20 मिनिटे थांबल्या असल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल उशीराने धावत आहेत. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाल्याने कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. याआधी सोमवारी (10 जून) पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

मध्य रेल्वेवरील खडवली रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी (6 जून) रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे लोकल सेवा तब्बल 35 ते 40 मिनिटे उशिराने धावत होत्या. याआधी बुधवारी (5 जून) देखील मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली होती. तसेच मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने धावत होत्या. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज जवळपास 20 मिनिटे लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर 79 पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरूदरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांत एकूण 79 पंप मशीन बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होते. सहा ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ केली आहे, अशी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास रेल्वेचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जाते. परिणामी, प्रवाशांना पायपीट करत इच्छितस्थळी पोहोचावे लागते. वादळवारा आणि पाऊस पडल्यामुळे झाडे पडण्याच्या घटना, सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे अशा घटना घडतात. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, नालेसफाई, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणे, रेल्वे रुळांची स्वच्छता करणे, रेल्वे मार्गात येणाऱ्या लोखंडी वस्तूंना गंजरोधक रंग लावणे अशी कामे सध्या सुरू आहेत. एप्रिलपासून सुरू केलेली कामे मे अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले असून आतापर्यंत 70 ते 80 टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटमुंबईलोकलमध्य रेल्वेठाणे