लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मान्सूनने उत्तर भारत पूर्णत: गाठला असतानाच दुसरीकडे तो मुंबईवर किंचित प्रमाणात का होईना रुसला आहे. कारण रात्री, अपरात्री मुसळधार सरी घेऊन येणारा पाऊस दिवसभर मुंबईकडे पाठ फिरवत आहे. परिणामी उन्हाच्या तडाख्याला मुंबईकरांना सामोरे जावे लागत असून, किंचित उकाडा त्यांचा घाम काढत आहे.
मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीला मुंबईकरांची चांगली हजेरी घेतली होती. पहिल्या आणि दुसऱ्या मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडाली होती. नंतर मात्र पावसाचे प्रमाण ओसरले. किंचित सरींवर सरी कोसळल्या. आता तर पावसाने दिवसा मुंबईला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. रात्री मात्र पावसाचा मारा पाहायला मिळताे. मध्यरात्री अथवा पहाटे पाऊस घेऊन येणारे ढग गर्दी करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत काही प्रमाणात असेच वातावरण आहे.
दरम्यान, वातावरणात झालेले हे बदल पुढील २४ तास कायम राहतील. काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
...............................