Join us  

मुंंबईत अजूनही आहे सुखद गारवा!; पहाटेचे तापमान १५ अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 3:07 AM

विशेष म्हणजे मुंबईच्या उपनगरातील बहुतांश ठिकाणांवर किमान तापमानाची नोंद १६ ते १७ अंश सेल्सिअस एवढी झाली.

मुंबई : एव्हाना हिवाळा संपून मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागतात. मात्र, यंदा मार्च अर्ध्यावर आला तरी मुंबईतला गारवा टिकून आहे. शुक्रवारची मुंबईकरांची पहाट १५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाने उजाडली. त्यामुळे मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत. दरम्यान, राज्यातही बऱ्यापैकी गारवा टिकून असून, नाशिक येथे शुक्रवारी किमान तापमानाची नोंद १२ अंश सेल्सिअस इतकी झाली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रातला गारवा अद्यापही कायम आहे. शुक्रवारी नाशिक येथे १२, पुणे १४.७ आणि मालेगाव येथे १३.५ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणातील किमान तापमानदेखील स्थिर आहे.

विशेष म्हणजे मुंबईच्या उपनगरातील बहुतांश ठिकाणांवर किमान तापमानाची नोंद १६ ते १७ अंश सेल्सिअस एवढी झाली. राज्यभरात किमान तापमान स्थिर राहण्याचा हा कल पुढील २४ तास कायम राहील आणि त्यानंतर मात्र तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात अधिकचा गारवा आहे. येथील किमान तापमान स्थिर राहण्याचा हा कल शनिवारीही कायम राहील. शनिवारसह रविवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८, १६ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.विदर्भाला पावसाचा इशारा१४ आणि १६ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१७ मार्च : मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

टॅग्स :तापमानमुंबई