मुंबई : अडचणींचा खडक फोडून महापालिकेने क्लिव्हलँड बंदर पर्जन्य जल उदंचन केंद्र व लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्र हे दोन्ही प्रकल्प पूर्ण केले असून, त्यामुळे ऐन पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मुंबई जलमय होणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.ब्रिमस्टोवॅड अंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रकल्पांपैकी इर्ला आणि हाजी अली पर्जन्य जल उदंचन केंद्र यापूर्वीच कार्यान्वित झाली आहेत. ब्रिटानिया पर्जन्य जल उदंचन केंद्र नोव्हेंबर, २०१५ पर्यंत तर, गझधरबंद पर्जन्य जल उदंचन केंद्र मे, २०१६ पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेगाने कामे सुरु आहेत. क्लिव्हलँड बंदर पर्जन्य जल उदंचन केंद्र व लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्राचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या पर्जन्य जल उदंचन केंद्रांची त्यात भर पडली आहे. परिणामी मुंबईकरांना संभाव्य पूरस्थितीचा सामना करावा लागणार नाही आणि त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे.अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी यासंदर्भात सांगितले की, सात बेटांची मुंबई समुद्रात भराव करुन जोडली गेली. आजचा हिंदमाता परिसर म्हणजे पूर्वाश्रमीचा हिंदमाता तलाव होता. अशा विविध सखल भागांमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जल उदंचन केंद्र महत्त्वाचे आहे. मुंबई शहरातील सुमारे १८०० हेक्टर परिसरातील पर्जन्य जलाचा निचरा करण्यास हातभार लावणारे हे दोन्ही प्रकल्प साकारताना भूसंपादन, अतिक्रमणे निर्मुलन, प्रकल्प बाधितांचे स्थलांतर, दलदलीच्या जागेत मजबूत पायाभरणी अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. (प्रतिनिधी)
मुंबईकरांचा पावसाळा सुखकर
By admin | Updated: June 18, 2015 01:11 IST