आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत गौरव : कोविड काळातील नियोजन, व्यवस्थापनाचे कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड काळात दररोज तब्बल साडेसात लाख अन्न पाकिटांचे वाटप मुंबई महापालिकेमार्फत गरजू, मजूर, प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना करण्यात येत होते. याव्यतिरिक्त साडेचार लाख नागरिकांना ‘अन्नधान्य किट’ वितरित करण्यात आले. काेविड काळात केलेल्या सूक्ष्मस्तरीय नियोजन व व्यवस्थापनाची दखल घेत मुंबई महापालिकेचा विशेष गौरव नुकताच एका आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेदरम्यान ऑनलाइन करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर गरजू व स्थलांतरित कामगारांच्या हाताला काम नसल्याने त्यांना दाेन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले. अशावेळी महापालिकेने आपल्या क्षेत्रातील गरजू नागरिकांना अन्न पाकिटे व अन्नधान्य किट पुरविण्यास सुरुवात केली. यासाठी ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’ हे तत्त्वही अमलात आणले.
दररोज सरासरी साडेसात लाख अन्न पाकिटे आणि साडेचार लाखांपेक्षा अधिक नागरिकांना अन्नधान्य किट देण्यात आले. याची दखल घेत ‘राइज फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे महापालिकेचा गौरव करण्यात आला. यासाठी आयाेजित ऑनलाइन कार्यक्रमात महापालिकेच्या नियोजन विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.
* असे केले पालिकेने नियोजन
१. महापालिकेद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘महाधान्य ॲप’ विकसित करण्यात आले. या ॲपच्या साहाय्याने अन्नधान्य वितरणाची अंमलबजावणी करण्यात आली.
१. अजूनही गरजेनुसार काही प्रमाणात अन्नधान्य वाटप सुरू आहे. यासाठी आवश्यक ते अन्नधान्य उपलब्ध करून त्याचे वितरण, सूक्ष्मस्तरीय नियोजन व व्यवस्थापन पालिकेच्या नियोजन विभागाद्वारे करण्यात येत आहे.
.........................