Join us  

मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार, काँग्रेसची मोठी घोषणा

By महेश गलांडे | Published: November 19, 2020 4:37 PM

काँग्रेसनेही मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे.

ठळक मुद्देमुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा काँग्रेसने केली. महापालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही घोषणा केली आहे. महाविकास आघाडीमध्ये जरी काँग्रेस शिवसेनेसोबत असली तरी महापालिकेत आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगित

मुंबई - राज्यातील विरोधी पक्ष आणि मुंबई महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवणार असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र भाजपाच्या रणनीतीवर शिवसेनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर, काँग्रेसनेही मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा काँग्रेसने केली. महापालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही घोषणा केली आहे. महाविकास आघाडीमध्ये जरी काँग्रेस शिवसेनेसोबत असली तरी महापालिकेत आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या या घोषणेमुळे महाआघाडीत खळबळ उडाली आहे. यापूर्वी, आगामी सर्व निवडणुका या एकत्रितपणे लढविल्या जातील, अशी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी एकत्रच निवडणुका लढेल, असे म्हटले होते. मात्र, काँग्रेसने आपली स्वतंत्र भूमिका जाहीर केल्यामुळे महाआघाडीत एकता नसल्याचं दिसून येतंय. शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढल्यास पारंपरिक मतदार दुरावेल, असे काँग्रेसला वाटते, त्यामुळेच काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे समजते. सन 2022 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. 

फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर 

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत मनसेसोबत युती करणार?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होती, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, आगामी महापालिकेत भाजपाचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता, या निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना प्रविण दरेकरांनी सांगितले की, आजतरी भाजपा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असं सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजपा युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असं संजय राऊत म्हणाले होते.

टॅग्स :काँग्रेसशिवसेनामुंबई महानगरपालिकानिवडणूक