Join us
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सर्वतोपरी मदत करणार; तिसरे समाज साहित्य विचार संमेलन संपन्न

By स्नेहा मोरे | Updated: December 21, 2023 19:46 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘समाज साहित्य प्रतिष्ठान संस्थेचे तिसरे समाज साहित्य विचार संमेलन ’ शनिवारी मुंबईत दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या सभागृहात पार पडले.

मुंबई - समाज साहित्य विचार संमेलनाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल. आपल्या संस्थेसाठी मुंबईमराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहही उपलब्ध करेल, असे आश्वासन तिसरे समाज साहित्य विचार संमेलनाटे प्रमुख पाहुणे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिले आहे. याप्रसंगी, देशातील सांस्कृतिक दहशतवाद आणि मराठी साहित्यातील वर्चस्ववाद यांचा उल्लेख केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांना तत्कालीन समाजाने ज्या तऱ्हेने छळले त्यावेळेस १९व्या शतकातील महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या किती कर्मठ होता याचे वर्णन केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘समाज साहित्य प्रतिष्ठान संस्थेचे तिसरे समाज साहित्य विचार संमेलन ’ शनिवारी मुंबईत दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या सभागृहात पार पडले. समीक्षक, भाषा अभ्यासक नितीन रिंढे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे मनोगत आजच्या वैचारिक, साहित्यिक , सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर घडणाऱ्या दुर्घटनांची मीमांसा करणारे होते. हे वैशिष्ट्यपूर्ण समाज साहित्य विचार संमेलन संस्थेचे संस्थापक अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, कार्यवाह वैभव साटम आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या परिश्रमातून खऱ्या अर्थाने यशस्वी झाले. संमेलन अध्यक्ष नितीन रिंढे, , चंद्रकांत वानखडे, अजय कांडर यांनी मनोगत व्यक्त केले.

मराठी साहित्यात उच्च वर्गाचे सांस्कृतिक वर्चस्व राहिले आहे. याचे उदाहरण म्हणून त्यांनी ना. सी. फडके यांचे उदाहरण दिले. त्याचप्रमाणे त्या काळात बहुजनांचे आदर्श असलेल्या बुद्ध, शिवाजी आणि यांची चरित्रे महतप्रयासाने लिहिणाऱ्या इतिहासकार कृष्णराव केळूसकर यांच्या साहित्यिक कार्याबद्दल संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक नितीन रिंढे यांनी माहिती दिली. पुरस्कार वितरण समारंभात चंद्रकांत वानखडे यांना ‘ इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर पुरस्कार’, कवी डॉ. अनिल धाकू कांबळी यांना ‘प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृति भूमी काव्य पुरस्कार ’, बार्शीच्या डॅा.ऐश्वर्या रेवडकर आणि जयदीप विघ्ने यांना ‘ जयंत पवार कथा पुरस्कार’ , विजय जावळे यांना ‘काशीराम आत्माराम साटम स्मृति समाज साहित्य कादंबरी पुरस्कार’, तसेच कुसुमाकर मासिकाचे संपादक श्याम पेंढारी आणि एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव या दोघांना ‘ बालसन्मित्र’कार ‘ पां. ना. मिसाळ ’ सन्मान पुरस्कार देण्यात आले.पुरस्कारांनी गुणवत्ता सिद्ध होता नसली तरी चंद्रकांत वानखडे यांच्या सारख्या विचारवंताना दिलेल्या पुरस्कारामुळे त्यांचे गुण आमच्यात येतील अशी आमची भावना आहे, असे अजय कांडर यांनी सांगितले. ज्येष्ठ विचारवंत आजचा काळ किती भयावह आणि काळजी करण्यासारखा आहे. हुकुमशाही आणि देशातील स्वायत्त संस्थांवर असलेले सरकारी नियंत्रण हे देशाच्या लोकशाही आणि राजकीय नितीमत्तेला मारक ठरत चालल्याचे दिसते, असे चंद्रकांत वानखेडे यांनी म्हटले.

टॅग्स :मुंबईमराठी