Join us

मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठप्प

By admin | Updated: June 15, 2015 22:58 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे दिवसागणिक

धाटाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे दिवसागणिक रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गतिमान व्हावे या मागणीसाठी मंगळवारी कोकणातील शेकडो पत्रकार एकत्र येवून हातात काळे झेंडे घेऊन वडखळ ते पेणपर्यंत लाँग मार्च काढणार आहेत. पत्रकारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने अखेर २०१२ मध्ये रस्त्याच्या कामाला सुरु वात केली. केवळ ८४ कि. मी. लांबीच्या इंदापूर ते पळस्पे या टप्प्याचे कामही सुरू झाले. केवळ ३० टक्के काम झाले आणि जुने सरकार जाऊन नवे सरकार सत्तेवर येताच रस्त्याचे काम अगदी ठप्पच झाले. याकरिता पत्रकारांना पुन्हा एकदा आंदोलन करावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचा विषय केवळ अपघातांपुरताच मर्यादित नसून हा कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे. त्या अनुषंगाने चार जिल्ह्यातील पत्रकार एकत्र येवून महामार्गाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. यावेळी वडखळ ते पेण असा लाँग मार्च मंगळवारी काढण्यात येणार आहे. मुंबई - गोवा महामार्गावर मागील पाच वर्षांत २९८३ अपघात झाले आहेत. त्यात ६८५ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर २५८३ जण गंभीररीत्या जखमी झाल्याची आकडेवारी आहे.(वार्ताहर) महामार्गाचे काम संथगतीने- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप ते पाथरादेवी रस्ता आणि मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या ८४ कि. मी. रस्त्याचे काम एकाच वेळी सुरू झाले होते. झाराप-ते पाथरादेवी रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार करण्यात आले. मात्र पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे काम कासवगतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असून पन्नास टक्केही काम पूर्ण झाले नाही. या कामाला गती यावी व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाने लक्ष घालावे यासाठी कोकणातील पत्रकारांकडून वडखळ ते पेण असा लाँग मार्च मंगळवारी काढण्यात येणार आहे. यावेळी संबंधित प्रशासनाला काम लवकर करण्याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे.