मुंबई : पृथ्वीवरील भूकवच अस्थिर असून, त्याची सातत्याने हालचाल सुरू असते किंवा हे भूकवच सरकत असते. परिणामी पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाला भूकंपाचा धोका असून, मुंबई शहरालादेखील अंदाजे ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धोका आहे, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.आयआयटी मुंबईचे प्रोफेसर आणि भूगर्भतज्ज्ञ सुब्रमण्यम यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, भूकंपाचे झोन तयार करण्यात आले आहेत. या शहराला ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धोका आहे. येथे गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत, त्यांनाही भूकंपाचा अधिक धोका आहे. पर्यावरणतज्ज्ञ अॅड. गिरीश राऊत यांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवरच्या प्रत्येक ठिकाणाला भूकंपाचा धोका आहे; तसा तो मुंबईलादेखील आहे. पृथ्वी हा असा एकच ग्रह आहे, की ज्याच्यामध्ये सतत खदखदणारा द्रव पदार्थ आहे आणि हासुद्धा एक प्रकारे जीवनातील घटक आहे. अगदी ४० वर्षांपूर्वी म्हणजे कोयनेला भूकंप येण्याअगोदर दख्खनचे पठार सुरक्षित मानले जात होते. मात्र आता ही परिस्थिती राहिलेली नाही. मुंबईचा विचार करता मुंबई शहर हे झोन ४ मध्ये येते. मुंबई उपनगर हे झोन तीनमध्ये येते. झोन चार हा भाग अतिधोकायक म्हणून ओळखला जातो, तर झोन तीन हा भाग मध्यम धोकादायक ओळखला जातो. अग्निशमन दल मदतकार्यासाठी सज्जमुंबई अग्निशमन दलाने बचाव व मदतकार्यासाठी विशेष पथक तैनात ठेवले आहे़ २४ जवान, सहा अधिकारी व मदतकार्यात आवश्यक साधनांसह हे पथक भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात सज्ज आहे़ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सूचना मिळताच हे पथक नेपाळ अथवा उत्तर भारतात रवाना होईल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर यांनी सांगितले़
मुंबईलाही भूकंपाचा धोका!
By admin | Updated: April 26, 2015 02:16 IST