Join us  

मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 19 जणांचा मृत्यू; 60 पेक्षा जास्त जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 5:44 AM

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाड पूर्व परिसरात असलेल्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर भिंत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईसह उपनगरांत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यातच अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली. यात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक जण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. याशिवाय अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान झाले असून बचावकार्य सुरु आहे.

दुर्घटनेत जखमी झालेल्या 15 जणांना जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यापैकी दोघांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ट्रॉमा केअर रुग्णालयातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. तर 52 जणांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय अंधेरीच्या कूपर रुग्णालयात 2 जणांना दाखल करण्यात आलं आहे. 

दुसरीकडे, पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला यामध्ये बांधकाम मजूर असलेल्या एका महिलेसह बालकाचा समावेश आहे. सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सिंहगड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ही सीमाभिंत आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत नवीन बांधकाम सुरू आहे. भिंतीच्याकडेला या बांधकामावरील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये राहात होते. 

 

टॅग्स :मुंबई