दिपक मोहिते, वसईमहानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकाम विरोधातील मोहिम अधिक तीव्र केली असून अनेक चाळमाफीयांवर एमआरटीपी अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांवर पोलीस यंत्रणा कोणती कारवाई करते याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.४ वर्षापूर्वी वसईतील एका सामाजिक संघटनेने वसई विरार उपप्रदेशातील ५० हजार अनधिकृत बांधकामासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही सर्व अनधिकृत बांधकामे त्वरीत तोडण्याचे आदेश महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर महानगरपालिका व महसूल प्रशासनाने सुमारे १० हजार अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. त्यानंतर मात्र काही चाळमाफीयांनी वसई न्यायालयात दाद मागीतल्यानंतर या कारवाईस स्थगिती मिळाली. सुमारे २ ते ३ वर्षे ही मोहीम रखडल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा कारवाई करण्यास सुरूवात केली. गेल्या महिनाभरात महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने शेकडो बांधकामे उध्वस्त केली. ही कारवाई करतानाच महानगरपालिका प्रशासनाने १९२ चाळमाफीयांवर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांवर पोलीस यंत्रणा कोणती कारवाई करते याकडे वसईकर नागरीकांचे लक्ष लागले आहे.
१९२ चाळ माफीयांवर एमआरटीपी गुन्हे दाखल
By admin | Updated: December 16, 2014 22:57 IST