मुंबई : मोबाइलमुळे कुटुंबाची ६७ टक्के आर्थिक भरभराट झाल्याचे सांगत मालकीचा मोबाइल असणे आणि आर्थिक प्रगती यांचा परस्परसंबंध असल्याचे नुकत्याच एका सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या संस्थेने केलेल्या ‘मोबाइल मल्टीप्लायर स्टडी’मधून ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.महाराष्ट्रात मोबाइल वापरणाऱ्या कुटुंबाची आर्थिक प्रगती ही मोबाइल न वापरणाऱ्या कुटुंबापेक्षा ६७ टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे. हाच न्याय शहरातील नागरिकांसाठी लागू होत असून, शहरात ९० टक्के कुटुंबांकडे मोबाइल असून, त्यांचे जीवनमान उंचावलेले आहे. मोबाइल वापर अधिक असणाऱ्या राज्यात मानव विकास निर्देशांक आधारित सामाजिक कल्याणाचा स्तर मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. दरडोई उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हे परिणाम भारताच्या शहरी वस्त्यांमध्येही दिसून आले आहेत.या सर्वेक्षणातील महत्त्वाची बाब म्हणजे, १५ ते ३५ वयोगटातील कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबामध्ये मोबाइल मालकीचा असण्याचे प्रमाण ६४.८ टक्के आहे. तर महाराष्ट्रात ९३.२ टक्के पदवीधर व ९८ टक्के पदव्युत्तर व्यक्तींकडे स्वत:चा मोबाइल आहे. पण हे प्रमाण अशिक्षितांमध्ये ३९.१ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे.राष्ट्रीय स्तरावर मोबाइल नसणाऱ्या कुटुंबापेक्षा स्वत:चा मोबाइल फोन असणाऱ्या कुटुंबाची आर्थिक प्रगती ६२ टक्क्यांनी अधिक आहे. तर देशाच्या ग्रामीण भागात मोबाइल न वापरणाऱ्या कुटुंबापेक्षा मोबाइल वापरणाऱ्या कुटुंबाचा आर्थिक वापर खर्च ५२ टक्के अधिक आहे. भारतात मात्र हे प्रमाण ८५ टक्के दिसून आले आहे.मोबाइल फोन आणि देशभरातील प्रगती यांचा परस्परसंबंध असल्याचे या सर्वेक्षणातील निष्कर्षांत दिसले आहे. या अनुषंगाने, मोबाइल फोन असणे हे सामान्य जनतेच्या एकंदर हिताचे असल्याचे आढळले आहे. मोबाइलचा वापर साक्षरता स्तर, जीवनमान, शैक्षणिक कौशल्ये यांचा एकंदर दर्जा उंचावलेला दिसतो आहे.- बिनो पॉल, प्राध्यापक (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स)
मोबाइलमुळे आर्थिक जीवनमान उंचावले!
By admin | Updated: August 26, 2015 02:43 IST