Join us

अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आमदारांची घाई

By admin | Updated: May 28, 2015 01:16 IST

मंत्रालयात सध्या तुम्ही कोणत्याही मंत्री, सचिवांकडे गेले की बदल्यांची कामे घेऊन आलेल्या आमदारांची गर्दी दिसते.

मुंबई : मंत्रालयात सध्या तुम्ही कोणत्याही मंत्री, सचिवांकडे गेले की बदल्यांची कामे घेऊन आलेल्या आमदारांची गर्दी दिसते. मर्जीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी आमदारांकडून येत असलेल्या दबावामुळे मंत्री आणि सचिव हैराण झालेले आहेत.मंत्रालयात सध्या ठोक बदल्यांचा सीझन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली अधिकारांचे विकेंद्रीकरण करून सचिव व विभागीय अधिकाऱ्यांकडे ते दिले आहेत. त्यामुळे एरवी मुख्यमंत्र्यांकडे असणारी गर्दी आता मंत्री आणि सचिवांच्या दालनांकडे सरकली आहे. राज्यात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी अनेक आमदार मंत्र्यांच्या बंगल्यांचे उंबरठे झिजवताना दिसतात. बदल्यांसाठी शिफारस पत्रांचा सर्वाधिक पाऊस सार्वजनिक बांधकाम खात्यावर पडत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागात पारदर्शकता आणण्यासाठी आटापिटा चालविला असला तरी त्यांच्यावर आमदार बदल्यांसाठी प्रचंड दबाव आणत आहेत. आमदारांची पत्रेही बदल्यांच्या शिफारशीसाठीच असतात. मतदारसंघांमधील विकासाची ते क्वचितच आणतात, असा अनुभव काही मंत्र्यांनी सांगितला. नगरविकास, उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, बांधकाम आणि सहकार या खात्यांमध्ये बदल्यांसाठी आमदार विशेष आग्रही दिसतात. (विशेष प्रतिनिधी)आपल्या मतदारसंघात विशिष्ट अधिकारी असावा हा आमदारांचा आग्रह समजण्यासारखा आहे पण अनेक आमदार इतर जिल्ह्यांतील बदल्यांची कामे घेऊन येतात. अमरावती जिल्ह्यातील एक अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे दुसरे आमदार यांच्यात बांधकाम खात्यातील बदल्यांवरून रस्सीखेच सुरू आहे. ‘तुम्ही द्याल तो अधिकारी चालेल पण फक्त प्रामाणिक व चांगले काम करणारा द्या, अशी आगळी मागणी लातूर जिल्ह्णातील भाजपा आ. तुषार राठोड यांनी केल्याने सा.बां. विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यास सुखद धक्का बसला.