Join us  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या बंडाची आता तुलना करता येणार नाही- बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 6:45 PM

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या विधानावर बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानामुळे राज्यात वाद पेटलेला असतानात आज शिवप्रतापदिन सोहळ्यात राज्य सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

लोढा यांनी एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेमध्ये केलेल्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्रामधून औरंगजेबाच्या तावडीतून करवून घेतलेल्या बंडाशी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. लोढांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीची औरंगजेबशी तुलाना केल्याचं बोललं जात आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

मंगलप्रभात लोढा ह्यांनी जे वक्तव्य केलं त्यावर विचारले असता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या बंडाची आता तुलना करता येणार नाही ते बरोबर नाही, काही शब्द चुकून निघतात. काही कार्य घटना , गोष्टी शिवाजी महाराजांच्या कामाची साम्य असू शकतात, पण तुलना योग्य नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्य्रातील किल्ल्यात ठेवले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आग्य्रातून नाट्यमयरीत्या सुटका करून घेतली होती. ते तिथून सुटून बाहेर आले त्यामुळेच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याचप्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले, असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले होते. 

शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही- मुख्यमंत्री

लोढा यांच्या या विधानावरून राज्यातील राजकारणा तापले आहे. तसेच विरोधी पक्षांकडून माफी मागण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे लोढा यांनी म्हटले आहे. तर या विधानाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी थेट बोलणे टाळले. तसेच शिवरायांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, असे सांगितले. 

टॅग्स :मंगलप्रभात लोढाबच्चू कडू