मुंबई : वादग्रस्त भाषणांनी नेहमी चर्चेत राहिलेले आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल (एआयएमआयएम) या पक्षाचे नेते व आ. अकबरूद्दीन ओवैसी यांची नागपाड्यातील सभा अखेर शनिवारी रात्री रद्द करण्यात आली. ही सभा मोकळ्या जागेवर घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर यासाठी एखाद्यी शाळा किंवा हॉल शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही संस्थांनी घाबरून एआयएमआयएमला सभेसाठी जागा दिली नाही, तर काही शाळा व हॉल या आधीच कार्यक्रमांसाठी आरक्षित होत्या. परिणामी, ही सभा रद्द केल्याची घोषणा शनिवारी उशिरा केली. पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्याने आता सभा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असे आमदार वारीस पठाण यांनी सांगितले. या वेळी औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. येत्या काही महिन्यांत औरंगाबाद पालिकेची निवडणूक आहे. याचा प्रचार एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी व आमदार अकबरूद्दीन ओवैसी करणार असून येथे एमआयएमची सत्ता येईल, असा दावा जलील यांनी केला. ओवैसी हे मंगळवारपर्यंत मुंबईत असून, या काळात ते कार्यकर्त्यांना भेटतील. (प्रतिनिधी)ओवैसींना आधीच्या भाषणाबद्दल समन्सप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी एमआयएमचे हैदराबाद येथील आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांना समन्स जारी केले. या प्रकरणी गुलाम हुसेन खान यांनी न्यायालयात तक्रार केली आहे. ओवैसी यांनी २०१२मध्ये प्रक्षोभक भाषण केले होते. याची तक्रार पोलीस व गृह विभागाकडे केली. मात्र त्याची दखल घेतली नाही. तेव्हा न्यायालयाने याच्या कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी तक्रारीत आहे.
एमआयएमची मुंबईतील सभा अखेर झाली रद्द
By admin | Updated: February 8, 2015 01:56 IST