Join us  

गोरेगावच्या पत्राचाळीचा विकास म्हाडा पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 9:15 PM

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज म्हाडाला दिले. यामुळे पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात याविषयी बैठक झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. पत्राचाळ प्रकल्पासाठी २००८ मध्ये म्हाडा, विकासक आणि रहिवाशी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. त्यावेळी शासनावर विश्वास ठेवून ६७२ भाडेकरुंनी आपली घरे रिकामी केली होती. त्यामुळे ४७ एकर जमीन मोकळी झाली होती. तथापि एचडीआयएलने इतर विकासकांना यातील काही भूखंड विकले. मात्र, मुळ रहिवाशांची घरे रखडवली. दरम्यान, भाडेकरुंसाठी बांधावयाचे इमारतीचे अपूर्ण राहिलेले बांधकाम म्हाडाने पूर्ण करून द्यावे व शिल्लक भाडे द्यावे, अशी मागणी घेऊन भाडेकरू गेली दोन तीन वर्षे आंदोलने व पाठपुरावा करीत आहेत. आज अखेर त्याला यश आले आहे. हा भाडेकरूंनी दिलेल्या लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे.

 या निर्णयानंतर येथील भाडेकरुंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :म्हाडा