Join us

सागरी मार्गाला लागून धावणार मेट्रो

By admin | Updated: March 26, 2015 02:11 IST

नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान ३६ किमीच्या प्रस्तावित सागरी मार्गाला लागूनच मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ट्रान्स हार्बर लिंकसाठीच्या कर्जास केंद्राचा हिरवा झेंडामुंबई : नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान ३६ किमीच्या प्रस्तावित सागरी मार्गाला लागूनच मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. नवी मुंबईचे विमानतळ २०१९ पर्यंत सुरू होईल, असे त्यांनी जाहीर केले.अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले, सागरीकिनाऱ्याच्या बाजूने मेट्रो उभारण्याचा अहवाल तयार करण्यास नेदरलँड सरकारची मदतही घेतली जात आहे. नवी मुंबई विमानतळासाठीची निविदा प्रक्रिया येत्या मेपर्यंत पूर्ण करून आॅक्टोबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. बहुप्रतीक्षित शिवडी-न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी जपानच्या जायका या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यास केंद्राने राज्याला नुकतीच परवानगी दिली. सार्वजनिक वापरासाठी जमीन संपादित करण्यास टीडीआरचे धोरण लवकरच जाहीर केले जाईल. टीडीआर हा रेडिरेकनरशी संलग्न केला जाईल आणि टीडीआरच्या नावाखाली विशिष्ट व्यक्तींना लाभ देण्याचे प्रकार घडू दिले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. पोलीस गृहनिर्माण योजनेस चार एफएसआय देऊन त्यापैकी एकतृतीयांश एफएसआयची विक्री करून या योजना व्यवहार्य करण्यात येतील. सर्व महापालिकांच्या शहरांत ही योजना लागू केली जाईल.गिरणी कामगारांसाठी घरे उभारण्यासाठीचे असलेले लहान भूखंड महापालिकेला देऊन महापालिकेकडून सलग मोठा भूखंड घ्यायचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.वडाळा ते सातरस्ता चौक या मोनोरेल टप्पा-२ प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. चालू वर्षाअखेर या मार्गावरून मोनोरेल धावेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. नरिमन पॉइंट ते कांदिवली हा सागरी मार्ग मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहे.