Join us  

#Metooचा फटका चित्रपटांनाही; ‘हाऊसफुल्ल’चे शूटिंग थांबले, आणखी काही व्यक्तींवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 3:00 AM

‘मी टू’चा परिणाम आता थेट बॉलिवूडच्या सिनेमांवर होण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेता अक्षयकुमारने दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. त्यातच आणखी काही व्यक्तींनी आरोप केल्याने चित्रपटसृष्टीतील वातावरण ढवळले.

मुंबई : ‘मी टू’चा परिणाम आता थेट बॉलिवूडच्या सिनेमांवर होण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेता अक्षयकुमारने दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. त्यातच आणखी काही व्यक्तींनी आरोप केल्याने चित्रपटसृष्टीतील वातावरण ढवळले.‘हाऊसफुल्ल-४’ या अक्षयकुमारच्या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन साजिद खान करतो आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी अक्षयने ट्विट करत निर्मात्यांकडे केली आहे. या सिनेमात अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. नाना पाटेकरांवर आधीच तनुश्री दत्ता यांनी आरोप केले आहेत, तर साजिद खानवर तीन महिलांनी आरोप केले आहेत. महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी साजिदवर केलेल्या गंभीर आरोपांची दखल अक्षयने घेतली असून चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी देशाबाहेर होतो. परतल्यानंतर मला काही अस्वस्थ करून टाकणाऱ्या बातम्या ऐकायला मिळाल्या. म्हणूनच मी ‘हाऊसफुल्ल ४’च्या निर्मात्यांना चित्रीकरण थांबविण्याची विनंती केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे अशा प्रकरणात कडक कारवाई होणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे,’ असे अक्षयने ट्विटमध्ये स्पष्ट केले. तर साजिदने ट्विट करत ‘हाऊसफुल ४’चे दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझ्यावर जे काही आरोप होत आहेत, त्यामुळे माझ्या कुटुंबावरदेखील दबाव वाढत आहे. मी आता नैतिक जबाबदारी स्वीकारत ‘हाऊसफुल्ल-४’च्या दिग्दर्शक पदावरून पायउतार होत आहे. माझ्यावर जे काही आरोप होत आहेत ते खोटे असल्याचे मी सिद्ध करेनच. सत्य लोकांना लवकरच कळेल. पण तोपर्यंत माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नका,’ असे साजिदने ट्विट केले आहे.दरम्यान, ‘प्यार का पंचनामा’फेम दिग्दर्शक लव रंजन हेही लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकले. एका अभिनेत्रीने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर लव रंजन यांच्या गैरवर्तनाला वाचा फोडली आहे.‘त्या’ ३०८ गर्लफ्रेण्ड्सना विचारा - संजय दत्तया मोहिमेमुळे तुला भीती तर वाटत नाही ना, असा प्रश्न पत्रकारांनी संजय दत्तला केला असता तो चांगलाच संतापला. माझ्या त्या ३०८ गर्लफ्रेण्डसना याबाबत विचारा, ज्यांच्यासोबत माझे अफेअर होते, ज्यांच्यासोबत मी अनेकदा झोपलो. त्यांना विचारल्यास तुम्हाला कळेल की मी माणूस म्हणून कसा होतो, असा प्रतिप्रश्न संजूबाबाने केला. आपण कुणासोबत कधीही जबरदस्ती केली नाही; पण जिची सहमती होती तिला सोडले नाही, अशी कबुली त्याने दिली.

टॅग्स :मीटू