Join us  

हवामान खात्याला मुंबई  महापालिकेच्या कानपिचक्या,  मुंबईसाठी हवा वेगळा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 10:39 PM

मुंबई, दि. २२ -  हवामान खात्याने वर्तविलेले विशेषत: मान्सून काळातील अंदाज खोटे ठरत आहेत. यामुळे आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणेची धावपळ उडत असून महापालिकेला मुंबईकरांच्या टिकेचे धनी बनावे लागत आहे. अनेकवेळा अशी फजिती झाल्याने पालिकेच्या उच्चपदस्थ समितीने अखेर हवामान खात्याला कानपिचक्या दिल्या आहेत. हवामानाचा अंदाज स्थळ, काळ आणि प्रमाण सापेक्ष असण्याबरोबरच मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तविण्याची सुचना महापालिकेने केली आहे.मुंबईत 29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले. शंकर लक्ष्मण मटकर मार्गावर तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोल उघडण्यात आले होते. या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या समितीने आपला अहवाल पालिका आयुक्त अजोय मेहता यांना आज सादर केला. या अहवालात हवामान खात्यालाही पालिकेने सुचना केल्या आहेत.हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात येणारे अंदाज हे अनेकदा परिमाणवाचक व क्षेत्र-तपशिल त्यात नसते. तसेच ते ढोबळमानाने वर्तविलेले असल्याने आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी ही अनेकवेळा गरजेपेक्षा जास्त किंवा कधी कमी केल्या जाण्याचा धोका असतो. त्यामुळे हवामान खात्याने आपले अंदाज हे अधिक 'स्थलझ्रकाल झ्र प्रमाण' सापेक्ष वर्तवावेत. ज्यामुळे याबाबत आवश्यक ती आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी योग्य प्रकारे करणे शक्य होईल, अशी सुचना या अहवालातून करण्यात आली आहे.मुंबईसाठी हवा वेगळा अंदाजहवामान खाते मुंबई व कोकणसाठी एकत्रित अंदाज वर्तविते. त्याऐवजी त्यांनी मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तवावा. मुंबईसाठी अंदाज वर्तविताना त्यामध्ये देखील मुंबईतील ठिकाणे किंवा क्षेत्र निहाय अंदाज असल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीकोनातून योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल.या अंदाजामध्ये पावसाचे प्रमाण, कालावधी, तीव्रता याबाबत ठिकाणनिहाय वस्तुनिष्ठ अंदाज हवामान खात्याकडून मिळाल्यास, आपत्ती व्यवस्थापन विषयक पूर्वतयारी अधिक परिणामकारकपणे करता येऊ शकेल, असे या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई