Join us

पारा उतरणार; थंडी वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:09 IST

हवामान खाते : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात होणार घटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गायब झालेली थंडी ...

हवामान खाते : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात होणार घट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परत येत आहे. कारण हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात घट होणार आहे, तर मुंबईचे किमान तापमान १६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी शक्यता आहे. परिणामी, वाढत्या किमान तापमानाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना किंचित दिलासा मिळेल.

जानेवारीत मुंबईत बऱ्यापैकी थंडी पडली होती. डिसेंबर महिन्याच्या शेवटी मुंबईत पडलेल्या थंडीने मुंबईकरांना सुखद गारवा दिला होता, तर मधल्या काळात पडलेला अवकाळी पाऊस, उठलेले प्रदूषण अशा बदलामुळे मुंबईची हवा बिघडली होती. डिसेंबर महिना संपताना आणि नवे वर्ष सुरू होताना येथील प्रदूषण कमालीचे वाढले होते. त्यात हवामान बदलाने भर घातली होती. आता थंडी पुन्हा पडणार असतानाच प्रदूषणही वाढत आहे. मुंबईत गुरुवारी मालाड आणि नवी मुंबईत अधिक प्रदूषणाची नोंद झाली आहे.

* प्रदूषणही वाढण्याची शक्यता

आता हवामान खात्याने किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा थंडीसोबतच प्रदूषणही वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई आणि राज्यभरातील किमान व कमाल तापमानाचा आलेख पाहता, राज्यभरात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांवर दाखल झाला आहे, तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे.

...........................