ठाणे : महापालिकेच्या २०१२ पासून झालेल्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेले पूरक तसेच आयत्या वेळचे विषय बेकायदेशीरपणे मंजूर करण्यात आले असून याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.ठाण्यातील दक्ष नागरिक विक्रांत तावडे यांनी २०१२ पासून आतापर्यंत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शासनाने मान्य केलेल्या तसेच सर्वसाधारण सभांचे आणि उपविधीचे उल्लंघन करून पूरक तसेच आयत्या वेळचे विषय मंजूर केले असल्याचे शासनाच्या तसेच न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ४ आॅक्टोबर रोजी जनहित याचिका दाखल केली आहे. २८ सप्टेंबर तसेच ६ आणि ९ आॅक्टोबर २०१४ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एकूण ५०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये ४६८ कोटी रु पयांच्या आयत्या वेळच्या विषयांना नियमबाह्य मंजुरी देण्यात आली असल्याचे तावडे यांनी याचिकेमध्ये नमूद केले आहे. हे सर्व विषय खंडित करण्यात यावे तसेच ४५२ सभागृहात अशा प्रकारे बेकायदेशीर कामकाज केल्याने पालिका बरखास्त करण्यात यावी, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेचे विषय आता उच्च न्यायालयात
By admin | Updated: November 5, 2014 22:24 IST