पालघर : जव्हार तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये पाच महसूल गावातील १८० हेक्टर क्षेत्र शासनाने अधिकृतरित्या संपादीत केली नसताना ठेकेदाराने धाक दडपशाहीने या धरणाचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त होऊन संपूर्ण जमीन नापीक बनली आहे. ठेकेदारांच्या या गुन्हेगारी वर्तणुकीबद्दल व त्याला पाठीशी घालणाऱ्या पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी लेंडी धरणग्रस्तांनी भर मुसळधार पावसात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.धरणाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पुर्ण झाली नसताना ठेकेदार ए. बी. नागारेड्डी यांनी शेतकऱ्यांना धाक दपटशाही दाखवून धरणाचे काम पूर्णत्वापर्यंत आणले आहे. अशावेळी जलसंपदा व महसूल खात्याचे अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत तर विरोध करणाऱ्यांना पोलीसांचा धाक दाखविला जात आहे. या कामापोटी ठेकेदाराला कोट्यावधी रू. ची बिले अदा करण्यात आली असून बहुतांशी शेतकऱ्यांना मात्र एकही पैसा अदा करण्यात आला नसल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. पाच गावातील फक्त गोरठण गावातील काही शेतकरी याला अपवाद असून त्यांनी भरपाई रक्कम स्वीकारली आहे. तसेच या धरणाच्या बुडीत क्षेत्राचे सर्व्हेक्षणही करण्यात आले नसून त्यातील झाडोराही या धरणाच्या खोदकामामध्ये नष्ट झालेला आहे. या बाबतचा तपशीलही शासकीय अधिकाऱ्याकडे उपलब्ध नसल्याने भरपाई रक्कम निश्चित करताना शेतकऱ्यांची फसवणूक होणार आहे. तसेच काही शेतकऱ्यांना १ लाख गुंठे दराने नुकसान भरपाई देण्यात आली असून काही शेतकऱ्यांना ४ ते ५ हजार गुंठे दराने नुकसानभरपाई देऊन दुजाभाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे भोतडपाडा गावातील ६६ घरातील कुटुंबेही पाण्याखाली जाणार असून बेदखल होणार आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी ठोस पावले उचलावीत सर्व धरणग्रस्तांना १ लाख गुंठे दराने भरपाई मिळावी व संबंधीत ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी इ. मागण्यासाठी संघर्ष समितीने भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. (वार्ताहर)
लेंडी धरणग्रस्तांचे मुसळधार पावसात आंदोलन
By admin | Updated: June 23, 2015 00:56 IST