Join us

‘अवकाळी’ नुकसानीमुळे बाजारपेठ थंड

By admin | Updated: March 4, 2015 22:28 IST

वसई परिसरात तसेच ग्रामीण भागात होळी हा महत्त्वाचा सण जवळ येऊन ठेपला तरी खरेदीकडे गिऱ्हाईकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पारोळ : वसई परिसरात तसेच ग्रामीण भागात होळी हा महत्त्वाचा सण जवळ येऊन ठेपला तरी खरेदीकडे गिऱ्हाईकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिचे कारण अवकाळी पाऊस ठरला असून या पावसामुळे विटभट्टी व शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ही मंदी आली असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.होळीचा सण हा दिवाळीनंतरचा मोठा सण म्हणून साजरा केला जातो. हा उत्सवासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात पोळीसाठी लागणारे साहित्य, साखर गाठी, रंग, लहान मुलांसाठी पिचकारी इ. साहित्य या सणासाठी खरेदी करतात. या होळीच्या दिवसामध्ये बाजारपेठेमध्ये उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक दुकानात व्यापारी लाखोचा माल खरेदी करून त्यांची विक्री करतात. पण या अवकाळी पावसामुळे विटभट्टी, मासळी, शेती, बागायती या व्यवसायीकांचे मोठे नुकसान झाल्याने व या पावसामुळे होळीच्या सणासाठी अगोदरच विटभट्टी व्यवसाय बंद करून मजूर गावी गेल्याने ग्रामीण भागातील दुकाने गिऱ्हाईका अभावी ओस पडली आहेत. त्याचप्रमाणे या वर्षी प्रत्येक व्यवसायामध्ये मंदी असल्यामुळे नागरीक पैसे जपून खर्च करत आहेत. यामुळे यंदाची होळी व्यापाऱ्यांसाठी लाभदायक नाही.आमच्या दुकानात आम्ही लाखोंचा रंग, पिचकारी, साखरगाठी त्याचप्रमाणे पुरणपोळीसाठी लागणरे साहित्य इ. माल खरेदी केला आहे पण आमचा २५ टक्के सुद्धा संपला नसून आणलेला माल गिऱ्हाईक नसल्यामुळे अंगावर पडेल याची भीती वाटत असल्याचे व्यापारी कल्पेश पाटील यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)डहाणू तालुक्यातील कासा बाजारपेठेत होळी सणाच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरातील नागरीक होळी सणासाठी व पूजेसाठी लागणारे सामान खरेदी करताना दिसत होते.कासा, सायवन, चारोटी, परिसरातील २५ ते ३० गावांसाठी कासा बाजार खरेदीसाठी असल्याने सकाळपासून परिसरातील नागरीकांनी दुकानात एकच गर्दी केली होती. कासा भागातील आदिवासी गावपाड्यांतील बरेच कुटुंब विटभट्टी, पाड्यांमध्ये बांधकाम मजूरी आदी कामासाठी शहराकडे जातात. त्यामुळे ही कुटुंबे बाजारपेठेकडे सणाच्या खरेदीसाठी गर्दी करतात. होळीच्या सणासाठी पिचकारी, रंग, साखरगाठ्या खरेदी मोठ्या प्रमाणात मोठ्या व्यक्तीबरोबर लहान मुलेही करतात दिसत होती. मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा २० ते २५ रू. पिचकारी किंमत वाढल्याचे ग्राहक व दुकानदारांकडून सांगण्यात आले.