नायगाव : मंडईतून करापोटी वसूल करण्यात येणाऱ्या महसुलात कर्मचारी भ्रष्टाचार करीत असल्याने पालिकेचे उत्पन्न घटले आहे, मात्र याबाबत पालिकेने अजूनही निविदा न काढल्याने होणारा विलंब वसुली करणाऱ्यांना फायदेशीर ठरणारा आहे.वसई विरार शहर मनपाच्या वसई ई प्रभाग कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वसई मच्छीमार्केट, होळी बाजार, पापडी व तामतलाव येथे येणाऱ्या विक्रेत्यांकडून पालिका बाजार कर आकारते. या महसुलातून पालिकेला महिन्याला लाखो रू. चा कर मिळतो, मात्र मागील काही दिवसांपासून या बाजार वसुलीचा ठेका संपल्याने पालिका कर्मचारी वसुली करतात, मात्र त्याची कुठलीच पावती दिली जात नाही. सर्वसाधारण हा महसूल निम्म्याहून निम्मा झाल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.विक्रेत्यांनी पावतीची मागणी करूनही पावती दिली जात नाही. ठेका संपल्याने आता वसुलीसाठी अनेकांना रान मोकळे झाले आहे. पालिकेने त्वरित निविदा काढून याबाबत नियमानुसार वसुली करणे क्रमप्राप्त आहे, मात्र याबाबतच्या प्रक्रियेच्या फाईल्सच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अडकून पडल्याचे माहिती प्राप्त होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
वसुलीच्या नावाखाली अनेकांची हातसफाई
By admin | Updated: July 7, 2014 01:28 IST