Join us

मानखुर्द, ट्रॉम्बेत तिवरांची कत्तल

By admin | Updated: May 21, 2014 04:24 IST

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मानखुर्द आाणि ट्रॉम्बे परिसरात पोलीस अणि पालिका अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने तिवरांचे जंगल संपवण्याचे सत्र सुरू आहे.

मुंबई : एकीकडे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी झाडे लावण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मानखुर्द आाणि ट्रॉम्बे परिसरात पोलीस अणि पालिका अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने तिवरांचे जंगल संपवण्याचे सत्र सुरू आहे. तिवरांच्या जागी झोपड्या उभारल्या जात असताना सर्वच सरकारी यंत्रणा त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या वर्षभरापासून ट्रॉम्बेतील सेक्टर डी, सेक्टर ई आणि आंबडेकर नगर तसेच मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर आणि मंडाळा परिसरातील शिवनेरी नगर या परिसरात भूमाफियांकडून राजरोस तिवरांची कत्तल होत आहे. कत्तलीनंतर या झाडांवरच मोठ्या प्रमाणात भरणी टाकून ती जागा अडवण्यात येते. काही दिवसांतच पत्र्याच्या झोपड्या आणि कालांतराने पक्की घरी उभारली जात आहेत. अशाप्रकारे या ठिकाणी लाखो अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. याच परिसरात राहणार्‍या या भूमाफियांकडून प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांना झोपड्यांची विक्री केली जाते. यात स्थानिक पोलीस आणि पालिका अधिकार्‍यांना त्यांचा हिस्सा मिळत असल्याने तक्रारी दाखल होऊनही सरकारी यंत्रणेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. धक्कादायक बाब म्हणजे मानखुर्दच्या मंडाळा परिसरात तर काही पोलिसांंनीच अशाप्रकारे अनधिकृत झोपड्या उभारल्या आहेत. मुंबईतील सर्वाधिक प्रदूषित परिसर म्हणून चेंबूर, मानखुर्द आणि ट्रॉम्बेची ओळख आहे. या ठिकाणी आरसीएफ, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएआरसी, टाटा वीज प्रकल्प आणि अ‍ॅजीस अशा रासायनिक कंपन्या आहेत. तसेच देवनार कत्तलखाना, देवनार डम्पिंग ग्राउंड हे पालिकेचे काही प्रकल्प आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. परिणामी या ठिकाणच्या रहिवाशांना दमा, श्वसनाचा त्रास असे आजार आहेत. यापासून काही प्रमाणात तरी दिलासा मिळावा यासाठी पालिकेकडून रहिवाशांना झाडे लावण्याची विनंती केली जात आहे. मात्र काही भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आशीर्वादामुळे तिवरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने एखादी आपत्ती आल्यावर प्रशासनाला जाग येईल का, असा संतप्त सवाल रहिवासी करीत आहेत.