Join us

दरवर्षी पसरते मलेरियाची साथ

By admin | Updated: May 16, 2014 02:30 IST

डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या सुमारे पंधरा ते वीस गावात तसेच खेड्यापाड्यात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून दरवर्षी येथे मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू तसेच विचित्र तापाची साथ पसरते.

डहाणू : पावसाळ्यापूर्वी चिंचणी, वरोर, बावडा या गावातील गल्लीगल्लीत तसेच रस्त्यावर असलेल्या उघड्या गटारी, सार्वजनिक शौचालयांसोबतच अनेक महिन्यांपासून रस्त्यावर साचलेल्या कचर्‍याची वेळीच विल्हेवाट करण्याची मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश आवचार यांना केली आहे. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या सुमारे पंधरा ते वीस गावात तसेच खेड्यापाड्यात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून दरवर्षी येथे मलेरिया, टायफॉईड, डेंग्यू तसेच विचित्र तापाची साथ पसरते. गेल्या वर्षी चिंचणी, बावडा, वायगांव, धा. डहाणू या परिसरात डेंग्यूची साथ पसरल्याने असंख्य रुग्णांना डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आठ ते दहा रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना वापी तसेच बलसाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन ते चार वर्षात डेंग्यूच्या आजाराने चार ते पाच नागरिकांचा बळी गेला असून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने डेंग्यूच्या साथीत वाढच होत आहे. डहाणूच्या सागरी किनार्‍यावर वसलेल्या या गावांत रस्त्यावरील सार्वजनिक गटारे तसेच शौचालयाची वेळोवेळी साफसफाई, देखभाल दुरुस्ती होत नसल्याने त्याची प्रचंड दुर्गंधी येत असते. याबाबत ग्रामपंचायतीला अनेकवेळा तक्रारी करुनही ग्रा.पं. लक्ष देत नसल्याचे आरोप ग्रामस्थ करीत आहे, तर अनेक ग्रामपंचायतींकडे कचराकुंडी तसेच सफाई कामगार नसल्याने घरातील घनकचरा रस्त्यावरच फेकत असतात.