Join us

सायबर गुन्हांविरोधातील कायदा अधिक कठोर करा; अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी

By मनोहर कुंभेजकर | Updated: August 2, 2023 16:10 IST

ओळख लपवून नंबर देणे, महिलांना फसवणे, हनीट्रॅप सारखे प्रकार वाढत चालले आहेत.

मुंबई: देशात व राज्यात सायबर गुन्ह्यांचे वाढत चाललेले प्रमाण व त्या माध्यमातून होणारी नागरिकांची फसवणूक पाहता सायबर गुन्ह्यां विरोधात असलेल्या कायद्यातील तरतुदी अधिक कठोर करण्याची मागणी मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.

ते म्हणाले की, ओळख लपवून नंबर देणे, महिलांना फसवणे, हनीट्रॅप सारखे प्रकार वाढत चालले आहेत. इतर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. मागे अशाच स्वरुपाच्या सायबर गुन्ह्याचा बळी ठरलेला १६ वर्षांचा बाल कलाकार आत्महत्या करायला निघाला होता. आज सायबर गुन्ह्यांविरोधात असणारे कायदे कमकुवत आहेत. आरोपींना जामीन पटकन मिळतो. कायद्यातील तरतुदी कठोर करुन जामीन कसा लवकर मिळणार नाही हे पाहायला हवे. कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तो कोणत्या धर्माचा नसतो असे अस्लम शेख म्हणाले.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सायबर गुन्ह्यांसंदर्भात इंडियन आयटी अँक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येते. हा कायदा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांमुळे हा कायदा कमकुवत झाला आहे. मात्र केंद्र सरकारने आता हा कायदा सुधारायला घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही या कायद्या संदर्भात आपली मते व सूचना पाठवलेल्या आहेत. लवकरच याबाबतीत एक सक्षम कायदा अस्तीत्वात येईल.

टॅग्स :सायबर क्राइम